पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाचं विमान जरा जमिनीवर आलं आहे. दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये काही ठराविक फलंदाजांचा अपवाद वगळता इतरांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. दोन्ही संघांमधला तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर सुरु होणार आहे. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचं पारडं मालिकेत वर असलं तरीही भारताला ही कसोटी मालिका जिंकण्याची संधी असल्याचं, माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : शशी थरुरांनी सोडवला भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीचा प्रश्न…

“भारताला अजुनही मालिका विजयाची चांगली संधी आहे. फक्त संघातले खेळाडू कसा खेळ करतात यावर ते अवलंबून असेल, संघातील 11 ही खेळाडूंनी आपली जबाबदारी ओळखून खेळ करण्याची गरज आहे.” कोलकात्यातील एका शाळेत खासगी कार्यक्रमादरम्यान गांगुली बोलत होता. कोहली आणि पुजाराचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना आपला प्रभाव पाडता आला नसल्याचंही गांगुलीने म्हटलं आहे. यावेळी सौरव गांगुलीने 2020 सालापर्यंत सिलीगुडी येथे आंतरराष्ट्रीय शाळा स्थापन करण्याचीही घोषणा केली आहे.