कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने कोलकाता कसोटीच्या पहिल्या दिवशी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. बांगलादेशला पहिल्या डावात १०६ धावांवर बाद केल्यानंतर भारताने पहिल्या दिवसाअखेरीस ३ गड्यांच्या मोबदल्यात १७४ धावांपर्यंत मजल मारली. दिवसाच्या अखेरीस कर्णधार विराट कोहली ५९ तर अजिंक्य रहाणे २३ धावांवर नाबाद खेळत होता. पहिल्या दिवसाअखेरीस भारताने बांगलादेशवर ६८ धावांची आघाडी घेतली आहे. बांगलादेशकडून इबादत हुसेनने २ तर अल-अमिन हुसेनने १ बळी घेतला. अवश्य वाचा - IND vs BAN : विराटचा विक्रम, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार त्याआधी, दुसऱ्या सत्राच्या अखेरीस भारतीय संघाने एका गड्याच्या मोबदल्यात ३५ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या कसोटीत द्विशतक झळकावणारा मयांक अग्रवाल या कसोटी सामन्यात १४ धावांवर बाद झाला. अल-अमीन हुसेनने त्याला माघारी धाडलं. यानंतर ठराविक अंतराने रोहित शर्माही माघारी परतला. यानंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. चेतेश्वर पुजाराने ५५ धावा केल्या. अवश्य वाचा - IND vs BAN : विराट-रोहितच्या शर्यतीत पुन्हा विराटचीच बाजी ! याआधी, कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली. आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १०६ धावांवर संपवला. इशांत शर्मा, उमेश यादव आणि मोहम्मद शमी या त्रिकुटाने बांगलादेशच्या डावाला खिंडार पाडत भारतीय संघाचं पारडं जड ठेवलं. इशांतने पहिल्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला. उमेश यादवने ३ तर मोहम्मद शमीने २ बळी घेतले. बांगलादेशकडून सलामीवीर शादमान इस्लमा, अखेरच्या फळीत लिटन दास आणि नईम हसन यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. पहिल्या सत्रापर्यंत बांगलादेशचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात ७३ धावांपर्यंत मजल मारु शकला. अवश्य वाचा - IND vs BAN : इडन गार्डन्सवर भारतीय गोलंदाजांकडून जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय चुकला. १५ धावसंख्येवर इमरुल कायसला माघारी धाडत इशांत शर्माने बांगलादेशला पहिला धक्का दिला. यानंतर बांगलादेशच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. एकामागोमाग एक फलंदाज विकेट फेकत राहिल्यामुळे बांगलादेशची परिस्थिती बिकट झाली. अवघ्या ३८ धावांवर बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत परतला होता. उमेश यादव, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांनी भेदक मारा करत बांगलादेशच्या डावाचं कंबरडं मोडलं. अवश्य वाचा - IND vs BAN : मायदेशात खेळताना इशांतला सूर सापडला, निम्मा संघ केला गारद