अनुभवी आणि तरुण खेळाडूंनी केलेल्या धडाकेबाज खेळाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध मालिका खिशात घातली. अखेरच्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देत रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवलं. यादरम्यान भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर अर्धशतकाची नोंद झाली आहे. टीम इंडियाकडून सर्वाधिक टी-२० सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता बुमराहचं नाव आलेलं आहे. न्यूझीलंडविरुद्धचा पाचवा टी-२० सामना हा बुमराहचा ५० वा टी-२० सामना ठरलाय. भारतीय संघाकडून सर्वाधिक टी-२० सामने खेळलेले खेळाडू - रोहित शर्मा - १०७ महेंद्रसिंह धोनी - ९८ विराट कोहली - ८२ सुरेश रैना - ७८ शिखर धवन - ६१ युवराज सिंह - ५८ जसप्रीत बुमराह - ५०* दरम्यान टीम इंडियातला अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाकडेही या यादीत आपलं स्थान पक्क करण्याची संधी होती.मात्र भारतीय संघ व्यवस्थापनाने अखेरच्या सामन्यात केवळ एक बदल केल्यामुळे जाडेजाला या यादीत आपलं नाव येण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. दरम्यान टी-२० मालिकेनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.