भारतीय संघाचा सलामीवीर मयांक अग्रवाल याने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली. नाणेफेक जिंकून विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीत दोन शतकं झळकावणारा रोहित शर्मा पुणे कसोटीत स्वस्तात माघारी परतला. पण मयांक अग्रवालने चेतेश्वर पुजाराच्या साथीने शतकी भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. मयांक अग्रवालने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सलग शतक झळकावले.

मयांकने दमदार कामगिरी करत भारतीय संघाला एका जुन्या विक्रमाशी बरोबरी करून दिली. मयांकचे शतक हे भारतीय संघाकडून या मालिकेतील चौथे शतक ठरले. पहिल्या कसोटी सामन्यात मयांकने १ तर रोहितने २ शतके ठोकली होती. या सामन्यात मयांकने आणखी एक शतक लगावले. त्याचसोबत एका मालिकेत चार शतके ठोकण्याची ही टीम इंडियाची चौथी वेळ ठरली. या आधी माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दोन वेळा मालिकेत ४ शतके ठोकली होती, तर २००९-१० मध्ये सेहवागने २ आणि गंभीरने २ शतके ठोकली होती. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या सामन्यात मयांक आणि रोहितने मिळून ४ शतके लगावली.

त्याचसोबत महत्वाची बाब म्हणजे भारतीय संघाला या मालिकेत एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. या आधी एका कसोटी मालिकेत भारताने ४ पेक्षा अधिक शतके लगावलेली नाहीत. या मालिकेत भारताकडून आणखी एका फलंदाजाने शतक ठोकल्यास तो विक्रम ठरू शकेल.

याशिवाय, सलग दोन शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही मयांकने स्थान मिळवले आहे. २००९/१० साली विरेंद्र सेहवागने सलग दोन शतके झळकावली होती. मयांक अग्रवालने यंदाच्या हंगामात ही कामगिरी करुन दाखवली. मयांक अग्रवालने १९५ चेंडूंमध्ये १६ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १०८ धावा केल्या. अखेरीस कगिसो रबाडाने कर्णधार फाफ डु-प्लेसिसकरवी झेलबाद करत भारताला धक्का दिला.