विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजीतील लय कायम राखत एक नवा विक्रम केला. त्याने फलंदाजी करताना आवश्यक ११ धावा पूर्ण केल्या आणि विराटचा विक्रम मोडीत काढला. आवश्यक ११ धावा करत त्याने टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्याचा मान मिळवला.

सामना सुरु होण्याआधी रोहित शर्माला हा विक्रम रचण्यासाठी ११ धावांची आवश्यकता होती. त्याच्या नावावर टी२० क्रिकेटमध्ये २ हजार ९२ धावा जमा होत्या. आज यात आवश्यक ११ धावांची भर घालत रोहितने हा विक्रम रचला. या विक्रमाबरोबरच रोहितने विराट कोहलीचा विक्रमदेखील मोडला. भारताकडून टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात कोहली अव्वल स्थानी होता. त्याच्या नावे ६२ सामन्यांमध्ये ४८.८८ च्या सरासरीने २ हजार १०२ धावा जमा आहेत. हा टप्पा आज रोहितने ओलांडला. मात्र यासाठी त्याला ८५ सामने खेळावे लागले.

या टी२० मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी रोहित शर्मा कर्णधारपद भूषवत आहे. ही मालिका ३ सामन्यांची असल्याने रोहितला या मालिकेत धावांचा रतीब घालून कोहलीच्या पुष्कळ पुढे जाण्याची संधी आहे.