IND vs WI : विंडीजविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि २७२ धावांनी जिंकला. हा सामना भारताने अगदी सहज जिंकला. आपली पहिली कसोटी खेळणारा पृथ्वी शॉ याने पदार्पणात शतक ठोकले आणि आपल्या नावे अनेक विक्रम केले. त्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव झाला. त्याला वाहवा मिळाली. अनेकांनी त्याची तुलना वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गज खेळाडूंशी केली. पण कर्णधार विराट कोहलीने मात्र या साऱ्यावर आपले रोकठोक मत व्यक्त केले आहे. त्याची कोणाशीही तुलना केली जाऊ नये, असे विराट म्हणाला.

पृथ्वी शॉ याने केलेला खेळ हा त्याच्या प्रतिभेमुळे आहे. त्यामुळे त्याची किंवा त्याच्या खेळाची इतर खेळाडूंशी तुलना करू नका. कारण दिग्गज खेळाडूंशी त्याची तुलना झाली तर त्याला त्याचे दडपण येऊ शकते आणि त्यामुळे त्याच्या नैसर्गिक खेळावर परिणाम होऊ शकतो, असे मत कोहलीने व्यक्त केले.

‘पृथ्वी शॉ हा प्रतिभावान खेळाडू आहे. तो चपळ आणि हुशार आहे. तो उत्तम खेळ करतो. पहिल्या सामन्यात त्याने जी अभूतपूर्व खेळी केली, तशीच खेळी पुन्हा पुन्हा करण्यास तो समर्थ आहे. त्याच्याकडे उत्तम आणि दीर्घकाळ चांगला खेळ करण्याची कला आहे. पण तो अतिशय नवोदित आहे. त्याला त्याच्या पद्धतीने खेळ करून देणे आणि त्याच्या पद्धतीने धडे घेणे महत्वाचे आहे’, असेही विराटने नमूद केले.

दरम्यान, माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याच्याशी पृथ्वी शॉ ची तुलना केली जाऊ नये. पृथ्वी शॉची ही केवळ सुरुवात आहे. त्याला त्याचा खेळ खेळू द्या, अशा आशयाचे मत क्रिकेटपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.