Ind vs Eng : भारताविरुद्धच्या अंतिम कसोटीत आज इंग्लंडने संयमी खेळ करत तिसऱ्या दिवसअखेर २ बाद ११४ धावा केल्या. भारताची गोलंदाजी म्हणावी तितकी प्रभावी होऊ शकली नाही. त्यातच सलामीवीर कुक आणि कर्णधार रूट या जोडीने आपला अनुभव पणाला लावत सुंदर खेळी केली. त्यामुळे दिवसअखेर इंग्लंडकडे १५४ धावांची आघाडी झाली असून सामन्यातील आणखी दोन दिवसाचा खेळ बाकी आहे. या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावाला संथ सुरूवात केली. भारताला ४३ षटकांच्या खेळात इंग्लंडचे केवळ २ गडी बाद करता आले. सलामीवीर जेनिंग्स १० धावांवर बाद झाला, तर नव्या चेंडूवर मोईन अली २० धावा करून तंबूत परतला. शमी आणि जडेजाने १-१ बळी टिपला. त्याआधी भारताचा पहिला डाव २९२ धावांत आटोपला. ६ बाद १७४ या धावसंख्येवरुन आज जडेजा-हनुमा विहारीने पुढे डावाला सुरुवात केली. हनुमा विहारीने पदार्पणाच्या कसोटीत अर्धशतक झळकावले. त्याने ५६ धावा केल्या. पहिल्या सत्रात इंग्लंडला केवळ १ गडी बाद करता आला. दुसऱ्या सत्रात रवींद्र जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण इशांत शर्मा (४) अाणि मोहम्मद शमी (१) झटपट बाद झाले. अखेर बुमराहच्या साथीने जडेजाने काही काळ फलंदाजी केली. पण बुमराह धावबाद झाला आणि भारताचा डाव संपुष्टात आला. जडेजाने सर्वाधिक नाबाद ८६ धावा केल्या. तत्पूर्वी कर्णधार काल झालेल्या खेळात कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने सर्वाधिक ४९ धावा केल्या. शेवटच्या सत्रात इंग्लंडच्या गोलंदाजांनी 'कमबॅक' करत झटपट बळी टिपले. अँडरसन, स्टोक्स आणि अली यांनी २-२ तर ब्रॉड, करन आणि रशीदने १-१ बळी टिपला.