टी-२० मालिकेत ५-० असा विजय मिळवत नवीन वर्षात पहिल्या परदेश दौऱ्याची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. ऑकलंड वन-डे सामन्यात न्यूझीलंडने भारतावर २२ धावांनी मात करत वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २७४ धावांचं आव्हान भारतीय संघाला पेलवलं नाही. भारताकडून श्रेयस अय्यर आणि अखेरच्या फळीत रविंद्र जाडेजा-नवदीप सैनीने फटकेबाजी करत चांगली झुंज दिली.पण त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. पहिल्या वन-डे प्रमाणे दुसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी निराशा केली. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी झटपट माघारी परतली. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही या सामन्यात निराशा केली. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने सर्वप्रथम शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर नवदीप सैनीसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र अखेच्या षटकांत फटकेबाजीच्या प्रयत्नात भारताने विकेट फेकत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. जाडेजाने ५५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही या सामन्यात ५२ धावा केल्या. याव्यतिरीक्त इतर फलंदाज अपयशी ठरले. त्याआधी, रॉस टेलर आणि कायन जेमिन्सन यांनी अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या वन-डे सामन्यात २७३ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या वन-डे सामन्याच्या तुलनेत ऑकलंडच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मात्र अखेरच्या षटकांमध्ये न्यूझीलंडने फटकेबाजी करत आव्हानात्मक धावसंख्या उभी केलीच. युजवेंद्र चहल-शार्दुल ठाकूर जोडगोळीने मधल्या फळीत दमदार मारा करत न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश लावला. मोक्याच्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हाराकिरी केली, ज्याचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर आपलं वर्चस्व स्थापन केलं. नाणेफेक जिंकत भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गप्टील आणि हेन्री निकोल्स या सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केल्यानंतर चहलने निकोल्सला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर शार्दुल ठाकूरने टॉम ब्लंडलला माघारी धाडत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. मार्टीन गप्टीलने रॉस टेलरसोबत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गप्टीलने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात शार्दुल ठाकूरच्या अचूक थ्रो-वर गप्टील धावबाद झाला. त्याने ७९ धावांची खेळी केली. यानंतर न्यूझीलंडच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी हाराकिरी केली. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे न्यूझीलंड मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. अखेरीस अनुभवी रॉस टेलरने कायल जेमिन्सनच्या साथीने फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. टेरलच्या फलंदाजीमुळे न्यूझीलंडने २७३ धावांचा टप्पाही गाठला. रॉस टेलरने नाबाद ७३ धावांची खेळी केली. भारताकडून युजवेंद्र चहलने ३, शार्दुल ठाकूरने २ तर रविंद्र जाडेजाने १ बळी घेतला. न्यूझीलंडचे दोन फलंदाज धावबाद झाले.