पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विजय मिळवून विंडीजने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरीही साधली. या सामन्यात विंडीजच्या तळातल्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमक खेळामुळे सामना फिरल्याचं मत भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने व्यक्त केलं. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना, विंडीजची अवस्था 8 बाद 227 अशी झाली होती. यानंतर अॅशले नर्स आणि केमार रोच यांनी 56 धावांची भागीदारी रचत संघाला 283 धावांचा टप्पा गाठून दिला.

अवश्य वाचा – विंडिजविरुद्ध भारताचा पराभव, विराट म्हणतोय आज केदार जाधव हवा होता

“35 व्या षटकापर्यंत आम्ही सामन्याच चांगली गोलंदाजी केली. मात्र यानंतरच्या षटकांमध्ये आम्ही जास्त धावा दिल्या, ज्याचा फटका आम्हाला सामन्यात बसला. आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही असं म्हणता येणार नाही, मात्र विंडीजच्या फलंदाजांनी आमचा चांगला सामना केला. या गोष्टीचं कौतुक करावंच लागेल.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बुमराह बोलत होता. सोमवारी मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडीयमवर दोन्ही संघांमधला चौथा सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असेल.

अवश्य वाचा – IND vs WI : अजून लांबचा पल्ला गाठायचाय – जेसन होल्डर