पंजाब आणि मुंबई यांच्यात पंजाबच्या मैदानावर IPL 2019 चा सामना सुरु आहे. या सामन्यात पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. मुंबईच्या संघाकडून कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक हे दोघे फलंदाजीस आले. या दोघांनी फटकेबाजी करत अर्धशतकी सलामी दिली. पण ५१ या धावसंख्येवर मुंबईला पहिला गडी गमवावा लागला. रोहित विल्जोएनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने १९ चेंडूत ३२ धावा केल्या. त्यात ५ चौकार समाविष्ट होते. पण तो ज्या चेंडूवर बाद झाला, तो चेंडू बॉल ट्रॅकिंग प्रणालीत मात्र यष्ट्यांना लागत नसल्याचे दिसून आले, त्यामुळे DRS चा पर्याय स्वीकारला असता तर रोहित शर्मा बाद झाला नसता.

५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विल्जोएनने चेंडू फेकला. हा चेंडू रोहितच्या पॅडवर आदळला आणि पंचानी त्याला बाद ठरवले. याबाबत रोहितने नॉन स्ट्राईक असलेल्या डी कॉकला विचारणा केली. पण त्याने रिव्ह्यू घेऊ नये असे सुचवले आणि गोंधळामुळे मुंबईच्या संघाने रोहितची विकेट गमावली.

दरम्यान, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचे (आयपीएल) तीन वेळा विजेतेपद मिळवणारा मुंबई इंडियन्स संघ मागील लढतीमधील कामगिरीत सातत्य राखण्यासाठी उत्सुक आहे. त्यांना यजमान किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना करावा लागत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्धच्या लढतीत पंचांच्या चुकीमुळे मुंबईने अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला. फलंदाजीत रोहित शर्माला गवसलेला सूर ही मुंबईची जमेची बाजू म्हणावी लागेल. त्याशिवाय गोलंदाज जसप्रीत बुमरा, अनुभवी लसिथ मलिंगा, युवा फिरकीपटू मयांक मार्कंडे यांसारखी गोलंदाजांची फळी मुंबईकडे उपलब्ध आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्यापासून पंजाबला सावध राहण्याची आवश्यकता आहे.

दुसरीकडे पंजाबला राजस्थान रॉयल्सविरुद्ध यश लाभले असले, तरी कोलकाताविरुद्ध आंद्रे रसेलच्या घणाघातापुढे त्यांनी शरणागती पत्करली. पंजाबची फलंदाजी ख्रिल गेलवर अवलंबून असून गेल्या लढतीत डेव्हिड मिलर व मनदीप सिंग यांनीसुद्धा बऱ्यापैकी योगदान दिले. मात्र ८.४० कोटीची बोली लागलेला फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला स्वत:ला सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय दोन्ही सामन्यांत पंजाबच्या गोलंदाजांनी १८० वर धावा दिल्या असून कर्णधार रविचंद्रन अश्विनदेखील फारसा प्रभावी ठरलेला नाही.