IPL 2019 KXIP vs RR : पंजाबने मोहालीच्या मैदानावर पाहुण्या राजस्थानला १२ धावांनी धूळ चारली. राहुलचे अर्धशतक (५२) आणि मिलरची फटकेबाज खेळी (४०) यांच्या बळावर पंजाबने राजस्थानला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १७० धावांपर्यंतच मजल मारू शकला. स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या टप्प्यात ११ चेंडूत ३१ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले.

राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने सामना संपल्यानंतर आपल्या संघातील सहकाऱ्यांना खेळात सुधारणा करण्यासाठी कानपिचक्या दिल्या. तो म्हणाला की १८२ धावांचे आव्हान हे पेलण्यासारखे होते. डावाची सुरुवातदेखील चांगली झाली होती. पण अशा प्रकारच्या आव्हानाचा पाठलाग करताना झटपट गडी बाद होणे योग्य नाही. गोलंदाजानी चांगली कामगिरी केली, पण फलंदाजांनी मात्र चुकांमधून बोध घ्यायला हवा.

आमच्या संघाला १८२ धावांचा पाठलाग करायचा होता. अशा वेळी आपण कोणालाही फारसा दोष देऊ शकत नाही. स्टुअर्ट बिन्नी याने उत्कृष्ट फटकेबाजी करत आशा पल्लवित केल्या होत्या. केवळ १ -२ मोठ्या फटक्यांची गरज होती. तसेच आमच्या गोलंदाजीत शेवटचे षटक महाग पडले. त्याचा परिणाम सामन्यावर झाला. त्रिपाठी मधल्या फळीत चांगली कामगिरी करू शकत नव्हता, त्यामुळे त्याला सलामीला पाठवण्यात आले आणि मी चौथ्या क्रमांकावर खेळलो. पण आम्ही एकत्रित गडी गमावल्यामुळे सामना जिंकू शकलो नाही, असेही रहाणे म्हणाला.

दरम्यान, १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या लयीत असलेला जोस बटलर झेलबाद झाला आणि राजस्थानला पहिला धक्का बसला. बटलरने १ चौकार आणि २ षटकार खेचत २३ धावा केल्या. अश्विनला आडवा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन त्रिफळाचीत झाला. सॅमसनने २१ चेंडूत २७ धावा केल्या.अजिंक्य रहाणेच्या ऐवजी सलामीला आलेला राहुल त्रिपाठी अर्धशतक करून माघारी परतला आणि राजस्थानला तिसरा धक्का बसला. त्याने ४५ चेंडूत ५० धावा केल्या. धोकादायक फलंदाज टर्नर हा मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि राजस्थानला चौथा धक्का बसला. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा जोफ्रा आर्चरदेखील लवकर बाद झाला.पाठोपाठ कर्णधार अजिंक्य रहाणे फटकेबाजीच्या नादात बाद झाला. त्याने २१ चेंडूत २६ धावा केल्या. स्टुअर्ट बिन्नीने फटकेबाजीत करत ११ चेंडूत ३१ धावा केल्या. पण त्याची फटकेबाजी राजस्थानला विजय मिळवून देऊ शकली नाही.

त्याआधी, राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तडाखेबाज फलंदाजी करणारा ख्रिस गेल बचावात्मक फटका खेळताना माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला. गेलने २२ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकार खेचत ३० धावा केल्या. नव्या दमाचा मयंक अग्रवाल मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आणि पंजाबला दुसरा धक्का बसला. मयंकने १२ चेंडूत १ चौकार आणि २ षटकार यांच्या साहाय्याने २६ धावा केल्या. अतिशय शांत आणि संयमी सुरुवात केलेल्या सलामीवीर लोकेश राहुलने चौकार लगावत ४५ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतकानंतर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात लोकेश राहुल माघारी परतला. राहुलने ३ चौकार आणि २ षटकार खेचत ४७ चेंडूत ५२ धावा केल्या. निकोलस पुरन ६ चेंडूत ५ धावा करून माघारी परतला. मनदीप फारसा प्रभाव पाडू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. मिलरने पंजाबच्या धावसंख्येत भर घालत मोलाचा वाटा उचलला. त्याने ४० धावा केल्या. अखेरच्या षटकात अश्विनने ४ चेंडूत १७ धावा करत पंजाबला १८२ धावांचा पल्ला गाठून दिला.