लॉकडाउनपश्चात आपला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा खेळण्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियासमोरच्या अडचणी काहीकेल्या कमी होत नाहीयेत. बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर काम करत असलेले रोहित आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहेत. ESPNCricinfo ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. उर्वरित दोन कसोटीमधील सहभागाबद्दलही नंतर निर्णय घेतला जाणार आहे.

आयपीएलदरम्यान खेळत असताना रोहित आणि इशांत यांना दुखापत झाली होती. याच कारणासाठी रोहितची निवड समितीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत भारतीय संघात निवड केली नाही. परंतू त्यानंतर रोहितने आयपीएल सामने खेळण्याचा निर्णय घेतल्यामुळे रोहितला कसोटी संघात स्थान देण्यात आलं. बीसीसीआयमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रोहित इतर खेळाडूंसोबत युएईवरुन ऑस्ट्रेलियाला रवाना झाला असता तर तो कसोटी मालिकेपर्यंत फिट होण्याची शक्यता होती.

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत, रोहित आणि इशांतने पुढील ३-४ दिवसांत ऑस्ट्रेलियाकरता रवाना होणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. ऑस्ट्रेलियात १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी लक्षात घेता रोहित आणि इशांतने निघण्यासाठी उशीर केल्यास सर्व अवघड होईल असं मत शास्त्रींनी व्यक्त कोलं होतं.

रोहितप्रमाणे इशांत शर्माही पूर्णपणे फिट झालेला नाहीये. टी-२० मालिकेत इशांतला खेळायचं असेल तर तो ४ षटकं टाकू शकला असता. परंतू कसोटी क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर त्याला फिटनेसकडे अधिक लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने ESPNCricinfo शी बोलताना व्यक्त केलं. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून या मालिकेत भारत ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. १७ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार असून कर्णधार विराट पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे.