शुक्रवारी रात्री बीसीसीआयने आगामी विंडीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. विंडीज व ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 संघामध्ये बीसीसीआयने महेंद्रसिंह धोनीला वगळून ऋषभ पंतला संधी दिली. या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याने, धोनीला टी-20 संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : तिसऱ्या सामन्यात झालेले हे 14 विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

EspnCricinfo या संकेतस्थळाशी बोलत असताना आगरकर याने आपलं मत मांडलं. 2020 साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वचषक पाहता धोनीला वगळण्याचा निर्णय योग्य असल्याचं आगरकरने म्हटलं आहे. एखाद्या खेळाडूची संघात निवड होत असताना तो किती महान खेळाडू आहे याऐवजी भविष्यकाळाचा विचार करणं गरजेचं आहे. “निवड समितीने धोनीचं करिअर संपलेलं नाही असा संदेश दिला आहे, यामधून त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे मला माहिती नाही. मात्र 2020 साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकात धोनी खेळेल की नाही याची शाश्वती नसताना त्याला सध्या आता संघात स्थान देण्यात काहीच अर्थ उरत नाही. टी-20 क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये त्याची कामगिरी चांगली होत नाहीये.”

अवश्य वाचा – धोनीला वगळण्याचा निर्णय विराट-रोहितच्या संमतीनेच – BCCI

“काळानुरुप तुम्हाला पुढच्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. धोनी कर्णधार असताना त्यानेही काही खेळाडूंच्या संघाती स्थानाबद्दल असाच निर्णय घेतला होता. तुम्ही किती महान खेळाडू आहात यापेक्षा सध्याच्या संघात तुमचं काय कामगिरी आहे हे पाहणं महत्वाचं आहे. निवड समितीला या निर्णयामुळे कदाचीत चाहत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, मात्र धोनीला संघातून वगळण्याचा निर्णय हा योग्यच आहे. अजित आगरकरने आपलं मत मांडलं. धोनी सध्या विंडीजविरोधात वन-डे मालिका खेळतो आहे, यानंतर पुढच्या मालिकांमध्ये त्याला संघात स्थान दिलेलं नाहीये.