मुकुंद धस

राष्ट्रीय उपकनिष्ठ बास्केटबॉल स्पर्धा

कांगडा येथे सुरू असलेल्या ४५ व्या उपकनिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी उपांत्य फेरीत धडक मारून सर्वाना चकित केले. उपांत्य फेरीत मुलांना राजस्थानशी लढावे लागणार असून मुलींना कर्नाटकविरुद्ध झुंज द्यावी लागणार आहे. मुलांचा दुसरा उपांत्य सामना उत्तर प्रदेश-छत्तीसगढ तर मुलींचा दुसरा उपांत्य सामना तामिळनाडू-छत्तीसगड यांच्यात रंगणार आहे.

महाराष्ट्राच्या मुलांनी अटीतटीच्या सामन्यात सुंदर सांघिक कामगिरीच्या जोरावर बलाढय़ हरयाणाला ७०-६१ असे चकित केले. प्रारंभी ३-६ असे पिछाडीवर पडलेल्या हरयाणाने आक्रमक खेळ करून पहिल्या सत्राअंती १८-१२ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मात्र साहिल धनवटेच्या आगमनानंतर खेळाचे पारडे महाराष्ट्राच्या बाजूने झुकले. साहिलने आक्रमक रिबाउंड्सच्या जोरावर नोंदवलेल्या गुणांमुळे महाराष्ट्राने १६-२२ची पिछाडी सलग १७ गुण नोंदवून भरून काढत निर्णायक आघाडी घेतली. कुणाल भोसले आणि सैफ शेख यांचादेखील या आघाडीत मोलाचा वाटा होता. मध्यंतराच्या ३०-२२ अशा आघाडीनंतर कर्णधार देव प्रेमी, साहिल आणि कुणाल यांनी सुंदर समन्वय राखत आघाडी कायम राखली. शेवटच्या सत्रात दोन्ही संघांनी वेगवान खेळ करून उपस्थितांच्या नजरेचे पारणे फेडले. १३ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या हरयाणाने, ४ मिनिटे बाकी असताना आक्रमक खेळ करून पिछाडी केवळ ६ गुणांवर (४८-५४) आणल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली. परंतु अनुभवी देव प्रेमीने साहिल आणि फैझ शेखच्या साथीने संयमी खेळ करून महाराष्ट्रास संस्मरणीय विजय मिळवून दिला. महाराष्ट्रातर्फे साहिल (२० गुण), देव प्रेमी आणि फैझ शेख (प्रत्येकी १२ गुण) यांची कामगिरी उठावदार झाली.

महाराष्ट्राच्या मुलींनी मात्र एकतर्फी सामन्यात दुबळ्या राजस्थानचा ४६-२५ असा धुव्वा उडवला. नेहमीप्रमाणे शोमिरा बिडयेने (१५ गुण) कर्णधाराला साजेसा खेळ करून संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. रिचा रवीने बचावात सुरेख कामगिरी करून तिला मोलाची साथ दिली.