राजस्थानवर रोमहर्षक विजय; हरयाणाकडून पराभूत झालेल्या महिला संघाचा आव्हान टिकवण्यासाठी संघर्ष

फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धा

फेडरेशन चषक कबड्डी स्पध्रेत अत्यंत चुरशीच्या लढतीत महाराष्ट्राच्या पुरुष संघाने शनिवारी राजस्थानवर ५२-४९ असा रोमहर्षक विजय मिळवून मदान गाजवले. मात्र महाराष्ट्राच्या महिला संघाला ‘ब’ गटातील अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत खेळणाऱ्या हरयाणाने ४१-३५ असा विजय मिळवला.

श्रध्दा पवार व सायली केरीपाळे यांची झालेली अव्वल पकड आणि निर्णायक क्षणी अभिलाषा म्हात्रे व सुवर्णा बारटक्के या अनुभवी खेळाडूंनी केलेली घाई, यामुळे महाराष्ट्राला पराभवाला सामोरे जावे लागले. उपस्थित प्रेक्षकांनीही संघाच्या खेळावर नाराजी प्रकट केली. या पराभवामुळे महाराष्ट्राच्या महिला संघाची वाटचाल बिकट झाली आहे. स्पध्रेतीला आव्हान राखण्यासाठी संघाला रविवारी बलाढय़ भारतीय रेल्वेचा सामना करावा लागेल.

शनिवारी झालेल्या पहिल्या लढतीत हरयाणाला भारतीय रेल्वेकडून पराभव पत्करावा लागला होता. एका सामन्याच्या विश्रांतीनंतर मदानावर उतरलेल्या हरयाणाविरुद्ध यजमान महाराष्ट्राचे पारडे जड होते. मात्र हरयाणाच्या खेळाडू या आव्हानासाठी ताकदीने सज्ज होत्या. सुरुवातीपासूनच त्यांनी महाराष्ट्रावर दडपण निर्माण केले होते. मध्यंतराला हरयाणाने १८-१६ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राच्या सायली आणि श्रद्धा यांनी सामन्याला कलाटणी दिली. पण अखेरच्या क्षणाला हरयाणाने सामन्यावरील पकड निसटू दिली नाही. सायली आणि श्रध्दा यांची अव्वल पकड झाल्याने सामन्याचे चित्र पालटले. हरयाणाच्या प्रियांका (१० गुण) आणि साक्षी कुमारे (७ गुण) यांनी उल्लेखनीय खेळ केला.

पुरुष गटात महाराष्ट्राने चुरशीच्या लढतीत राजस्थानला झुंजवले. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात गुणांचे पारडे क्षणाक्षणाला दोन्ही संघांच्या बाजूला झुकत होते. मध्यंतराला २४-२९ अशा पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राने निलेश साळुंखेच्या एका चढाईमुळे सामन्यात मुसंडी मारली. सामन्यातील चुरस पाहून प्रेक्षकांचीही उंत्कठा वाढवली. खेळाडूंमध्येही शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे पंचाना अनेक वेळा मध्यस्थी करावी लागली. अखेरची पाच मिनिटे असताना महाराष्ट्र एका गुणांनी पिछाडीवर होता. मात्र रिशांक देवाडिगाने पुढाकार घेत अखेरच्या चढाई करून महाराष्ट्राला आघाडी मिळवून दिली आणि बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला.

पहिल्या लढतीत रेल्वेने ४५-३४ अशा फरकाने हरयाणाला पराभूत केले. महिलांच्या ‘अ’ गटात हिमाचल प्रदेशने ३६-२१ अशा फरकाने पंजाबचा पराभव केला. पुरुषांच्या ‘ब’ गटात सेनादलाने ४१-२९ अशा फरकाने भारतीय रेल्वेवर विजय मिळवला. हरयाणाने उत्तर प्रदेश आणि राजस्थान यांना पराभूत केले. महिलांमध्ये हिमाचल प्रदेशने ४३-२४ अशा फरकाने छत्तीसगढचा पराभव केला. पुरुष गटात भारतीय रेल्वेने चुरशीच्या लढतीत कर्नाटकला ४७-४६ असे नमवले. महिला गटाच्या अखेरच्या सामन्यात पंजाबने उत्तर प्रदेशवर २७-१५ असा विजय मिळवला.

पंचांनी आम्हाला हरवले -सुहास जोशी

‘‘पंचांनी आम्हाला पराभूत केले. आमच्या खेळाडू हरयाणाच्या खेळाडूंची तक्रार करत होत्या. पण पंच त्याकडे लक्षच देत नव्हते. असे पाच वेळा घडले. पंचांनी काही निर्णय आमच्या विरोधात दिले. त्याचा संघाला फटका बसला,’’ असा आरोप करत महाराष्ट्राच्या महिला संघाचे प्रशिक्षक सुहास जोशी यांनी तीव्र शब्दांत नाराजी प्रकट केली.

स्पर्धेच्या प्रवेशिकांवरून गोंधळ

फेडरेशन चषक सामन्यांसाठी प्रवेशिका आवश्यक असल्याने दर्दी कबड्डी चाहत्यांना निराश होऊन माघारी परतावे लागत होते. याबाबत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुधाकर घाग यांनी सांगितले की, ‘‘मुंबईतील संघांना प्रवेशिका देण्यात आल्या आहेत आणि काही प्रवेशिका शाखेत वाटण्यात आल्या आहेत.’’ आयोजकांच्या या वाटाघाटीमुळे दर्दी चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. इच्छा असूनही केवळ प्रवेशिका नसल्याने आणि ते कुठे उपलब्ध होतात, याची कल्पाना नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागत होते.

स्पध्रेसाठी नऊ लाखांचे नवीन मॅट

स्पध्रेच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने नऊ लाखांचे नवीन मॅट खरेदी केले. एका मदानाला २१० मॅटचे तुकडे लागतात आणि उपनगर असोसिएशनने असे ८४० मॅट मागवले आहेत. उपनगर असोसिएशनच्या जुन्या मॅट शाळा आणि महाविद्यालयांना सरावासाठी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते.

राष्ट्रीय विजेत्या संघाचा गौरव

महाराष्ट्राला राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेत ११ वर्षांनंतर जेतेपद पटकावून देणाऱ्या पुरुष संघातील खेळाडूंचा शनिवारी फेडरेशन चषक स्पध्रेच्या निमित्ताने गौरव करण्यात आला.