कर्णधार राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखाली खेळणारा महाराष्ट्र संघ शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. महाराष्ट्रासमोर पहिल्या सामन्यात रेल्वेचे आव्हान असणार आहे.

गतवर्षी महाराष्ट्राला अंतिम फेरीत कर्नाटककडून आठ गडी राखून पराभव पत्करावा लागला होता. नुकताच झालेल्या विजय हजारे स्पर्धेत महाराष्ट्राला उपांत्यपूर्व फेरी गाठणेही जमले नाही. त्यामुळे यंदा कामगिरीत सुधारणा करण्याचे त्यांचे ध्येय असेल. ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, समद फल्लाह आणि सत्यजित बच्छाव यांसारखे प्रतिभावान खेळाडू महाराष्ट्राकडे आहेत. तर हर्ष त्यागी, प्रथम सिंग, मृणाल देवधर या खेळाडूंवर रेल्वेची मदार आहे.

महाराष्ट्र संघ : राहुल त्रिपाठी (कर्णधार), नौशाद शेख, अंकित बावणे, समद फल्लाह, सत्यजित बच्छाव, ऋतुराज गायकवाड, अवधुत दांडेकर, स्वप्निल गुगळे, अझिम काझी, मुकेश चौधरी, निकित धुमाळ, दिव्यांग हिमगणेकर.

आजचे अन्य सामने

 मुंबई वि. मिझोराम

विदर्भ वि. त्रिपुरा

सर्व सामन्यांची वेळ : सकाळी ९ वाजल्यापासून