पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलमान बट आणि कामरान अकमल यांनी आपल्याच क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. संघ निवड करत असताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची निवड समिती सातत्य दाखवत नाही असा आरोप या खेळाडूंनी केला आहे. कामरान अकमलने पाक क्रिकेट बोर्डाला, संघ कसा निवडायचा यासाठी बीसीसीआयकडून धडे घेण्याचा सल्ला दिला आहे. माजी कर्णधार सलमान बटनेही संघ निवडीच्या बाबतीत भारतीय क्रिकेट बोर्ड पाकिस्तानपेक्षा सरस असल्याचं मान्य केलं आहे.

“काही महिन्यांपूर्वी रोहित शर्मा २५ ते ३० च्या सरासरीने धावा काढत होत्या. मात्र भारतीय निवड समितीने त्याला सातत्याने संधी दिली आणि आता त्याच्या खेळात झालेला बदल आपण पाहतच आहोत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संघ निवड करताना बीसीसीआयप्रमाणे समजूतदारपणा दाखवत नाही. याचसोबत भारताच्या तुलनेत पाकिस्तानचं प्रथम श्रेणी क्रिकेट हे प्रगल्भ नाही. याच कारणामुळे पाकिस्तानी फलंदाजाच्या कामगिरीत सातत्य राहत नाही.” सलमान बट पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – भारताशी खेळलो नाही म्हणून आपलं क्रिकेट मरत नाही – जावेद मियादाद

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फलंदाजांना मदत होईल अशा खेळपट्ट्या तयार करणं खूप महत्वाची बाब आहे. यामधून आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी खेळी करण्यासाठी एक मोठा आत्मविश्वास येतो. मात्र पाकिस्तानमध्ये नुकत्याच मानाच्या Quaid-e-Azam चषक स्पर्धेत अंदाजे २० वेळा संघ १०० धावांच्या आत बाद झालेला आहे. त्यामुळे अशा स्पर्धांमधून खेळाडूंना कोणत्याही प्रकारे आत्मविश्वास मिळणार नसल्याचं, दोन्ही खेळाडूंनी आवर्जून नमूद केलं. याचसोबत पाकिस्तानी संघात निवड होण्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधली कामगिरी हा एकमेव निकष असावा असंही बटने नमूद केलं.