भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने स्वत:च्या मर्जीने हैदराबादमधील गोपीचंद अ‍ॅकेडमी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी तिच्यावर कोणताही दबाव टाकला नव्हता असे प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अ‍ॅकेडमीतर्फे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. रिओ ऑलिम्पिकपूर्वी सायनाने गोपीचंद अ‍ॅकेडमी सोडून बंगळुरुला विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

तिच्या या निर्णयामध्ये आमची कोणतीही भूमिका नव्हती, तो तिचा स्वत:चा निर्णय होता असे पदुकोण अ‍ॅकेडमीकडून सांगण्यात आले. ‘ड्रीम्स ऑफ बिलियन: इंडिया अँड द ऑलिम्पिक गेम्स’ या पुस्तकातील ‘बिटर रायव्हलरी’ या भागामध्ये गोपीचंद यांनी सायना नेहवालच्या गोपीचंद अ‍ॅकेडमी सोडण्याच्या निर्णयानंतर त्यांच्या काय भावना होत्या त्याबद्दल लिहिले आहे.

२०१४ वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर सायनाने बंगळुरुच्या पदुकोण अ‍ॅकेडमीमध्ये विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. तिच्या त्या निर्णयाने आपल्याला प्रचंड दु:ख झाले होते असे गोपीचंद यांनी लिहिले आहे. प्रकाश पुदोकण, विमल कुमार आणि वीरेन रास्किन्हा यांनी हैदराबाद सोडण्यासाठी सायना नेहवालचे मन वळवले.

त्यांच्या या अशा वागण्याचे आपल्याला प्रचंड वाईट वाटले असे गोपीचंद म्हणाले. भारताचे पहिले बॅडमिंटन सुपरस्टार प्रकाश पदुकोण यांच्याजवळ माझ्याबद्दल चांगले, सकारात्मक बोलण्यासाठी काही नाही का? याबद्दलही गोपीचंद यांनी पुस्तकात आश्चर्य व्यक्त केले आहे.