बांगलादेशविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. फलंदाजीत अनुभवी फलंदाजांना आलेलं अपयश, गोलंदाजांचा स्वैर मारा आणि गचाळ क्षेत्ररक्षण हे भारतीय संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण ठरलं. शिखर धवनने या सामन्यात ४२ चेंडूत ४१ धावांची खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर शिखरच्या या खेळावर खुश नाहीयेत.

अवश्य वाचा – धोनीच्या पुनरागमनासाठी BCCI ने घातली महत्वाची अट

पुढील दोन सामन्यांमध्ये शिखरच्या खेळात सुधारणा झाली नाही तर संघातल्या त्याच्या स्थानाबद्दलही प्रश्न विचारले जातील असा इशारा गावसकर यांनी दिला आहे. “पुढील दोन सामन्यांमध्ये शिखरने नीट फलंदाजी केली नाही तर त्याच्याबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात होईल. ४०-४५ चेंडू खर्च करुन तुम्ही तितक्याच धावा करणार असाल तर त्याचा संघाला काहीही फायदा होत नाही. शिखरला याच्यावर विचार करावा लागेल. जेव्हा खेळाडू मोठ्या कालावधीने संघात येतो, त्यावेळी त्याला मैदानावर स्थिरावण्यास वेळ जातो, मात्र चांगली कामगिरी करण्यावाचून शिखरकडे कोणताही पर्याय नाही.” गावसकर एका मुलाखतीत बोलत होते.

दरम्यान पहिल्या सामन्यात विजय मिळवत बांगलादेशने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. ७ नोव्हेंबरला राजकोटच्या मैदानावर दुसरा टी-२० सामना खेळवला जाईल. या सामन्यादरम्यानही पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे भारतीय संघात चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे दुसरा सामना होतो की नाही याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष असणार आहे.