ऋषभ पंत सध्या बॅटीने कमाल दाखवत असला, तरी त्याच्या यष्टीरक्षण कौशल्यावर अजूनही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ऋषभच्या यष्टीरक्षक कौशल्याबद्दल अनेकांच्या मनात शंका आहे. आशिया खंडातील खेळपट्टया या फिरकी गोलंदाजांना पोषक आहेत. पण या खेळपट्टयांवर यष्टीरक्षण करण्यासाठी ऋषभ पंत योग्य व्यक्ती आहे का? हा प्रश्न आजही कायम आहे.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतने सहज यष्टीचीत करण्याची संधी दवडली, त्यामुळे पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरु झाली आहे. ऑफ स्पिन गोलंदाजी करणाऱ्या आर. अश्विनने एका फसव्या चेंडूवर जॅक लीचला जाळयात अडकवलं होतं. क्रीझ बाहेर आलेल्या जॅकला यष्टीचीत करण्याची संधी होती. पण ऋषभ पंतला वेळेत बेल्स उडवता आल्या नाहीत. चेंडू त्याच्या ग्लोव्हजमधून निसटला. त्यावेळी हताश झालेल्या अश्विनच्या चेहऱ्यावरचे भावच सर्वकाही सांगून गेले.

आणखी वाचा- IND vs ENG व्वा पंत… जिंकलंस!! मैदानात असूनही त्याने केलं असं काही की…

इंग्लंडचा संघ सर्व बाद होऊन तंबूत परतत असताना अश्विन पंतबरोबर बोलत होता. पुन्हा अशी चूक होऊ नये, पंतने यष्टीचीत करण्याची संधी दवडू नये, यासाठी त्याला सल्ला दिला.

Video: अजब गजब विकेट… पुजारा कसा बाद झाला पाहिलंत का?

भारत अडचणीत; तळाच्या फलंदाजांवर भिस्त
जो रूटच्या शतकमहोत्सवी द्विशतकाच्या बळावर इंग्लंडच्या फलंदाजांनी उभारलेला ५७८ धावांचा डोंगर सर करण्यासाठी चेपॉकवर पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताची ६ बाद २५७ अशी केविलवाणी धडपड सुरू आहे. आघाडीची फळी कोसळल्यावर ऋषभ पंत (९१) आणि चेतेश्वर पुजाराने (७३) डावाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. आता फॉलोऑन टाळण्यासाठी १२२ धावांची गरज असलेल्या भारताची पुन्हा तळाच्या फलंदाजांवर भिस्त आहे.