बांगलादेश विरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने विजयासाठी दिलेलं १४९ धावांचं आव्हान बांगलादेशने ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा बांगलादेशचा निर्णय योग्य ठरला. भारतीय फलंदाजांवर अंकुश लावण्यात बांगलादेशी गोलंदाज यशस्वी ठरले. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीला मागे टाकलं आहे.

पहिल्या सामन्यात रोहित शर्माने केवळ ९ धावांची खेळी केली. शफिऊल इस्लामच्या पहिल्याच षटकात रोहित पायचीत झाला. मात्र या छोटेखानी खेळीत रोहित शर्माने आपला साथीदार विराट कोहलीला मागे टाकलं. रोहित आता टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पहिल्या सामन्याआधी रोहितला विराटचा विक्रम मोडण्यासाठी ७ धावांची गरज होती.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

  • रोहित शर्मा – २४५२ धावा
  • विराट कोहली – २४५० धावा
  • मार्टीन गप्टील – २३२६ धावा
  • शोएब मलिक – २२६३ धावा
  • ब्रँडन मॅक्युलम – २१४० धावा

सध्याच्या घडीला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात फक्त दोन धावांचं अंतर आहे. मात्र बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात रोहित शर्मा अपयशी ठरला असला तरीही उर्वरित दोन सामन्यांमध्ये त्याला आपली धावसंख्या वाढवण्याची चांगली संधी आहे. सध्या बांगलादेशने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे, त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.