बॉर्डर-गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १०३ षटकांचा सामना करत भारतीय संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली. हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळत भारताचा पराभव टाळला आहे. या सामन्यात भारतीय संघानं एक एतिहासिक कामगिरी केली आहे. चौथ्या डावात सहा भारतीय फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त चेंडू खेळण्याची कसोटी इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

सिडनी कसोटी वाचवत भारतीय संघानं बॉर्डर-गावसकर मालिका १-१ बरोबरीत राखली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात ४०७ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मानं ९८, शुबमन गिल ६४, चेतेश्वर पुजारा २०५, ऋषभ पंत ११८, हनुमा विहारी १६१ आणि आर. अश्विन १३८ चेंडूचा सामना केला आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता सर्वच फलंदाजांनी ५० पेक्षा जास्त चेंडू खेळून काढले आहेत.

आणखी वाचा- ऋषभ पंत; यष्टीमागे गमावलं, पण यष्टीसमोर कमावलं

आणखी वाचा- विहारी-अश्विनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना रडवलं; सिडनी कसोटी अनिर्णीत

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं तब्बल १३१ षटकं फलंदाजी करत सामना वाचवला. महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल १८ वर्षांनंतर भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात १०० पेक्षा जास्त षटकं खेळण्याची किमया साधली. या आधी २००२ साली भारतीय संघ लॉर्ड्सच्या मैदानावर खेळत होता. तेव्हा भारतीय संघाने कसोटीच्या चौथ्या डावात तब्बल १०९.३ षटकं खेळली होती. त्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने शतक ठोकलं होते. त्याच्या खेळीच्या जोरावरच भारताने ३९७ धावांपर्यंत मजल मारली होती.