भारत आणि पाकिस्तान या दोन संघात कोणताही खेळाचा सामना असला की तो रंगतदार होणार हेच नक्की असते. त्यात तो क्रिकेटचा आणि विश्वचषकाचा सामना असेल, तर खेळाडू सर्वस्व पणाला लावून सामना खेळत असतात. नुकत्याच झालेल्या ICC महिला टी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. पाकने दिलेल्या १३३ धावांचे आव्हान भारताने ७ गडी राखून पूर्ण केले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीतने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: झोडपले. पण दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातीला हरमनप्रीतचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले. तिच्या त्या कृत्यामुळे ती साऱ्यांच्या स्तुतीस पात्र ठरली.

सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत सुरू असताना खेळाडूंसोबत असलेल्या एका चिमुरडीला भोवळ आली. राष्ट्रगीत संपताच हरमनप्रीतने त्या चिमुरडीला उचलून घेतले आणि अधिकाऱ्यांकडे सोपवले.

हरमनप्रीतच्या त्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या घटनेने तिने सर्वांची मनं जिंकली. आणि तिच्या माणुसकी जपणाऱ्या कृतीने सर्व स्तरातून तिचे कौतुकदेखील झाले.

दरम्यान, भारताकडून मिताली राजच्या ४७ चेंडूत ५६ धावा आणि स्मृती मनधानाने २८ चेंडूत २६ धावा यांच्या बळावर भारताने पाकला पराभूत केले. भारतीय संघाने न्यूझीलंडपाठोपाठ पाकिस्तानलाही नमवून ब गटात आपले स्थान मजबूत केले आहे. भारताचा पुढील सामना आयर्लंडशी १५ नोव्हेंबरला होणार आहे.