भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष होते. हा सामना जितका रोमांचक व्हायला हवा होता, तितका झाला नाही. पाकिस्तानने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा भारताने सहज पाठलाग केला आणि ८ गडी राखून हा सामना जिंकला. पण त्या सामन्यात अपेक्षित असलेला थरार एका स्थानिक सामन्यात पाहायला मिळाला. विजय हजारे करंडक स्पर्धेत झारखंडच्या फिरकीपटूने कमालीची कामगिरी केली. झारखंडच्या शाहबाझ नदीम याने राजस्थान विरुद्ध झालेल्या सामन्यात १० धावा देऊन तब्बल ८ गडी बाद केले. नदीमच्या या कामगिरीच्या बळावर झारखंडने राजस्थानला २८.३ षटकात ७३ धावांत गुंडाळले. नदीमने १० षटके फेकली. त्यापैकी ४ षटके निर्धाव फेकण्यात त्याला यश आले. नदीमने केलेली कामगिरी ही लिस्ट अ प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. या आधीदेखील या प्रकारात भारतीयाच्या नावावरच हा विक्रम नोंदवण्यात आला होता. राहुल संघवी या दिल्लीच्या फिरकीपटूने २००१ साली हिमाचल प्रदेश संघाविरुद्ध खेळताना १५ धावांत ८ बाली टिपण्याचा विक्रम केला होता. तो विक्रम तब्बल २० वर्षांनी मोडण्यात आला. राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००१ साली झालेल्या एका कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, नदीम हा आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत असतो. तशातच या कामगिरीमुळे भारतीय संघाचे दार त्याच्यासाठी उघडण्याची शक्यता अधिक वाढली आहे.