कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. पहिल्या दोन वन-डे सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर मात करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतासमोर त्रिशतकी आव्हान उभं केलं. विशेषकरुन दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटने गोलंदाजीत केलेल्या वारंवार बदलांवर अनेकांनी टीका केली. भारतीय संघाचा माजी गोलंदाज आशिष नेहरानेही विराटच्या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. विराट कोहली चंचल स्वभावाचा कर्णधार आहे. गोलंदाजीत तो खूप सारे बदल करतोय. त्याच्या निर्णयांमध्ये धरसोड वृत्ती दिसून येतेय. फलंदाजीतही विराट कसलीतरी घाई असल्यासारखं खेळत होता. याआधी विराटने अनेकदा अशी मोठी आव्हान असताना चांगली फलंदाजी केली आहे. ३७५ धावांचं लक्ष्य असताना विराट फलंदाजी करत असताना ४७५ धावांचा पाठलाग केल्यासारखा खेळत होता." Cricbuzz शी बोलताना नेहराने आपलं मत मांडलं. अवश्य वाचा - निव्वळ वेडेपणा ! विराटच्या ‘त्या’ निर्णयावर माजी भारतीय गोलंदाजाची टीका सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर भारतीय संघासमोर आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान असणार आहे. गोलंदाजी हा दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. बुधवारी अखेरचा वन-डे सामना खेळवला जाणार आहे, ज्यासाठी विराट भारतीय संघात कोणते बदल करतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.