एम.एस.के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संघाच्या निवड समितीला मुदतवाढ मिळणार नसल्याचं, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयच्या मुंबईत पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर गांगुलीने पत्रकार परिषदेत ही बाब स्पष्ट केली.

तुमच्या कार्यकाळानंतर तुम्हाला मुदतवाढ मिळणार नाही, असं गांगुलीने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. बीसीसीआयच्या संविधानानुसार निवड समिती सदस्यांचा कार्यकाळ हा चार वर्षांचा असतो. प्रसाद आणि त्यांचे सहकारी गगन खोडा हे २०१५ साली निवड समितीचं काम पाहत होते, तर जतीन परांजपे, शरणदीप सिंह आणि देवांग गांधी यांनी २०१६ साली निवड समितीत सहभागी झाले. त्यामुळे नियमानुसार प्रसाद आणि खोडा यांचा कार्यकाळ संपलेला आहे.

अवश्य वाचा – भारतीय क्रिकेट पुन्हा फिक्सींगच्या सावटाखाली, खुद्द सौरव गांगुलीनेच दिली कबुली

“कार्यकाळ संपला म्हणजे कार्यकाळ संपला. त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलं आहे. तुम्हाला तुमच्या ठरवून देण्यात आलेल्या कार्यकाळापेक्षा जास्त काम करता येत नाही. समितीतल्या सर्वांचा कार्यकाळ संपत नसल्यामुळे काही लोकं या समितीत कायम राहतील.” बीसीसीआय अध्यक्ष या नात्याने गांगुलीने आपली बाजू मांडली. त्यामुळे आगामी काळात एम.एस.के. प्रसाद यांची जागा कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – आयसीसी बैठकीत बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी जय शहांवर