न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाने टी २० मालिका ५-० ने जिंकली, तर एकदिवसीय आणि कसोटी मालिका यजमानांनी खिशात घातली. न्यूझीलंडने एकदिवसीय मालिका ३-० ने तर कसोटी मालिका २-० ने जिंकली. त्यापैकी एकदविसीय मालिकेत पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने असं म्हटलं होतं की सध्याचं वर्ष हे टी २० आणि कसोटी क्रिकेटसाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे आम्ही एकदिवसीय क्रिकेटचा फारसा विचार करत नाही. त्या वक्तव्यावरून माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याने विराटवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सचिन म्हणतो, “…तेव्हा वाटलं ‘सोशल डिस्टन्सिंग’ गेलं खड्ड्यात”

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने बरीच वर्षे क्रिकेट खेळले. गांगुली, धोनी आणि विराट असे तिघांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळलेले खूप कमी लोक आहेत. त्यात नेहरा हा एक आहे. नेहराने भारतीय क्रिकेटमधील बदल अगदी जवळून पाहिला आहे. नुकतीच समालोचक आकाश चोप्रा यांच्या आकाशवाणी कार्यक्रमात नेहराने मुलाखत दिली. त्यावेळी नेहराने अनेक प्रशांची उत्तरे दिली. त्यावेळी त्याने विराटवर एकदिवसीय क्रिकेटच्या वक्तव्यावरून टीका केली.

“जर तुम्ही मालिका जिंकला असतात आणि त्यानंतर असं बोलत असाल तर ठीक आहे. यंदाचं वर्ष हे टी २० क्रिकेटचं आहे त्यामुळे आम्ही एकदिवसीय क्रिकेटबाबत फारसा विचार करत नाही, हे विराटचं वक्तव्य अगदी चुकीचं आहे. जर एकदिवसीय सामने महत्त्वाचे नाहीत, तर मग तुम्ही तिथे खेळायला गेलातच कशासाठी? यातून विराटला असं म्हणायचं होतं का की भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्नच केला नाही. मला विराटचं म्हणणं अजिबात मान्य नाही”, असं सडेतोड मत नेहराने व्यक्त केलं.

“आक्रमक गांगुली आणि शांत धोनी यांच्यात एक साम्य होतं”

या मुलाखतीत बोलताना नेहराने सौरव गांगुली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या मैदानावरील स्वभावातील एक साम्य सांगितलं. “धोनी आणि गांगुली हे दोघे अतिशय भिन्न स्वभावाचे कर्णधार होते. पण दोघांमध्ये एक साम्य होते. ते साम्य म्हणजे दोन्ही कर्णधारांकडे संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्याचे कसब होते. गांगुलीने जेव्हा कर्णधारपद स्वीकारलं तेव्हा संघ नवीन होता. याउलट धोनीने नेतृत्व स्वीकारलं, तेव्हा संघात अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडू होते. त्यांना नीटपणे हाताळणे ही धोनीपुढील कसोटी होती. दोघांनीही संघ नीटपणे हाताळले आणि त्यामुळे भारताला चांगले दिवस आलेले दिसत आहेत”, असं नेहराने सांगितलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashish nehra blasts on virat kohli asks if odi does not matter then why did you even go to play ind vs nz vjb
First published on: 06-05-2020 at 16:15 IST