वर्ल्डकप स्पर्धेत सर्वसाधारण कामगिरीची परिणती पाकिस्तान क्रिकेटमध्ये पाहायला मिळते आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कसोटी, एकदिवसीय तसेच ट्वेन्टी२० प्रकारात कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. पाकिस्तान संघाला वर्ल्डकप स्पर्धेत बाद फेरी गाठता आली नव्हती. पाकिस्तान संघाला वर्ल्डकप स्पर्धेत ९ पैकी ४ सामन्यात विजय मिळवता आला तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघाला भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. असंख्य माजी खेळाडू, चाहते यांनी पाकिस्तानच्या खराब कामगिरीचं खापर बाबर आझमच्या नेतृत्वावर फोडलं होतं. योगायोग म्हणजे वर्ल्डकपच्या काही दिवस आधी बाबरच्या नेतृत्वातच पाकिस्तान संघाने वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. बाबरला वर्ल्डकप स्पर्धेत लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. ९ सामन्यात बाबरने ४०च्या सरासरीने ३२० धावा केल्या. त्याच्या ८२.९०चा स्ट्राईक रेटवरही जोरदार टीका झाली होती. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान लग्नासाठी भारतात खरेदी केल्याप्रकरणीही बाबरवर टीका झाली होती. बाबरने ४३ वनडे, २० कसोटी आणि ७१ ट्वेन्टी२० सामन्यात पाकिस्तानचं नेतृत्व केलं आहे. 'मला तो क्षण स्पष्टपणे आठवतो. २०१९ मध्ये मला एक कॉल आला. पाकिस्तानचं नेतृत्व करण्यासंदर्भात तो कॉल होता. तेव्हापासून पाकिस्तानच्या नेतृत्वाची जबाबदारी मी सांभाळली आहे. या चार वर्षात अनेक चढउताराचे क्षण पाहिले. पाकिस्तान क्रिकेटला जागतिक पटलावर प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले. जागतिक क्रमवारीत वनडे प्रकारात अव्वल स्थानी झेप घेणं हे सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ, बोर्ड यांच्या एकत्रित प्रयत्नांचं यश होते. पाकिस्तानच्या चाहत्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्यामुळेच सर्वोत्तम प्रदर्शन करण्यासाठी प्रेरणा मिळते' असं बाबरने म्हटलं आहे. 'मी पाकिस्तानचा कर्णधार म्हणून राजीनामा देत आहे. हा निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे असं मला वाटतं. तिन्ही प्रकारात कर्णधार म्हणून राजीनामा दिला असला तरी खेळाडू म्हणून तिन्ही प्रकारात मी उपलब्ध असेन. नव्या कर्णधाराला माझा नेहमीच पूर्ण पाठिंबा मिळेल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवला', असं बाबरने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान पाकिस्तानच्या निवडसमितीचे प्रमुख इंझमाम उल हक यांनी राजीनामा दिला होता. वर्ल्डकप संपल्यानंतर लगेचच फास्ट बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल यांनीही राजीनामा दिला होता. लवकरच सर्व विदेशी प्रशिक्षकांची हकालपट्टी होणार असल्याचं वृत्तही समोर आलं होतं. बाबरच्या राजीनाम्यामुळे मोहम्मद रिझवान, शाहीन शहा आफ्रिदा यांच्या नावाचा कर्णधारपदासाठी विचार होऊ शकतो.