बायो-बबलच्या सुरक्षेत सुरु असणाऱ्या आयपीएलला सोमवारी मोठा झटका बसला. कोलकाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुविरोधात होणारा सामना पुढे ढकलण्यात आला. दरम्यान चेन्नई संघाच्या तीन सदस्यांनाही करोनाची लागण झाली आहे. बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आयपीएलवरही करोनाचं सावट आल्याने बीसीसीआय चिंतेत असून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार करत आहे. मुंबईतील वानखेडे, डी वाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन मैदानांमध्ये हे सामने खेळवले जाऊ शकतात. वानखेडेत आतापर्यंत आयपीएलचे दहा सामने पार पडले आहेत. इतर दोन मैदानं फक्त सरावासाठी वापरली गेली होती.

Video : मुंबईच्या सामन्यावरही करोनाचं सावट?; जाणून घ्या बायो-बबल हे प्रकरण आहे तरी काय?

सोमवारी कोलकाताच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आल्यानंतर बंगळुरुसोबतचा सामना पुढे ढकलण्यात आला. संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती सध्या विलगीकरणात असून आरोग्य तज्ञ त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान कोलकाता संघदेखील क्वारंटाइनमध्ये आहे.

आयपीएलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “चाचणीच्या तिसऱ्या फेरीत वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर पॉझिटिव्ह आढळले आहेत. इतर सर्व संघांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दोन्ही संघांना इतर खेळाडूंपासून वेगळं विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. मेडिकल टीम सतत त्यांच्या संपर्कात असून आरोग्याची माहिती घेत आहे. दरम्यान संघातील इतर अजून कोणाला करोनाची लागण झालेली आहे का यासाठी कोलकाताकडून चाचणी करण्यात येत आहे”.

भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून स्थिती अत्यंत गंभीर आहे. यामुळे आतापर्यंत पाच खेळाडू आयपीएल सुरु असतानाच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci considers shifting ipl 2021 entirely to mumbai sgy
First published on: 04-05-2021 at 10:21 IST