BCCI Statement On Chinnaswamy Stampede Incident: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं बंगळुरूत जोरदार स्वागत करण्यात आलं. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. पण, या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. या विजयी परेडदरम्यान चेंगराचेंगरी झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४७ जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेवर आता बीसीसीआयने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयचे सचिन देवजीत सैकिया काय म्हणाले?
या घटनेनंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी इंडियन्स एक्स्प्रेसला सांगितले की, ” ही डोळे उघडणारी घटना आहे. अशा परिस्थितीत काय करायला हवं, याचा विचार करायला हवा. दरवर्षी कोणता तरी संघ जिंकेल, त्यांच्या शहरात विजयी मिरवणूक निघेल. असं पून्हा घडू नये, यासाठी या घटनेतून आपल्याला धडा घ्यावा लागेल. सध्यातरी बीसीसीआयचे कुठल्याही फ्रँचायझीच्या खाजगी सेलिब्रेशनवर कुठलेही नियंत्रण नाही.
तसेच ते पुढे म्हणाले, “ काल ( आयपीएल फायनलवेळी) स्टेडियममध्ये १,३२,००० लोकं सामना पाहण्यासाठी आले होते. त्यांची सुरक्षितता आणि गर्दी व्यवस्थापनाची आम्ही काळजी घेतली. स्टेडियममधील सर्व स्टँड भरलेले होते. असं असतानाही एकही घटना घडली नाही. बंगळुरूमध्ये मोठी दुर्घटना घडली, यात बीसीसीआयची कुठलीही भूमिका नाही.”
आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले, “आम्ही या घटनेची दखल घेतली असून पुन्हा अशी घटना घडू नये याची काळजी आम्ही घेऊ. बंगळुरूमध्ये विजयी परेड काढली जाणार असल्याची आम्हाला कल्पना नव्हती. हे कोणी आयोजित केलं आणि इतके चाहते तिथे कसे जमले,याची आम्हाला कल्पना नव्हती.”
विजयी परेड रद्द करण्याचा निर्णय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांची प्रतीक्षा संपवत आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. अंतिम सामना झाल्यानंतर, बंगळुरूत विजयी परेड निघणार असल्याची चर्चा सुरू होती. खेळाडूंचा सत्कार झाल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत ओपन बसमधून विजयी परेड निघणार असल्याचं म्हटलं जात होते. संध्याकाळी ५:३० दरम्यान खेळाडू स्टेडियममध्ये दाखल होणार होते. मात्र ट्रॅफिक पोलिसांनी ट्विट करत, ही विजयी परेड रद्द करण्यात माहिती दिली.