भारत आणि इंग्लंडमध्ये लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर चौथी कसोटी सुरू आहे. या मैदानावर ५० वर्षांपूर्वी भारताने इंग्लंडमधील पहिलाच कसोटी विजय आणि पहिलाच मालिका विजय नोंदवला होता. अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखालील संघाने ओव्हल कसोटीत इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर आजतागायत भारतीय संघाला या मैदानावर विजयाची चव चाखता आलेली नाही. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी या कसोटीत समालोचन करताना एक भन्नाट किस्सा सांगितला आहे. ओव्हलवर ऐतिहासिक सामना जिंकला तेव्हा कर्णधार अजित वाडेकर झोपलेले होते, असे गावसकरांनी सांगितले. गावसकर म्हणाले, ''आबिद अलीने विजयी धाव घेतली, तेव्हा वाडेकर आराम करत होते. केन बँरिंग्टननी वाडेकरांना उठवले आणि भारत जिंकल्याचे सांगितले. तेव्हा वाडेकर बाहेर आले. भारतीय खेळाडूंना प्रेक्षक खांद्यावर उचलून आणत होते.'' मन्सूर अली खान पतौडी यांच्या जागी १९७१मध्ये अजित वाडेकर यांना संघाचे कर्णधारपद देण्यात आले. निवड समितीचा हा निर्णय योग्य ठरल्याचे वाडेकरांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले. वाडेकरांनी प्रथम कॅरेबियन किल्ला जिंकला आणि नंतर इंग्लंडमध्ये विजयी झेंडा उभारला. हेही वाचा - ENG vs IND : मैदानावर पाऊल ठेवल अन्…, जेम्स अँडरसनने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम वाडेकरांनी सांगितली होती आठवण. “शेवटच्या दिवशी मी पहिल्या चेंडूवर धावबाद झालो होतो आणि आम्हाला जिंकण्यासाठी अजूनही ९७ धावांची गरज होती. विश्वनाथ फलंदाजीला मैदानात येत होता. तो मला म्हणाला, ‘आराम कर. जा आणि डुलकी घे. आपल्याला धावा मिळतील’. मी पाहिले तर विश्वनाथ आणि फारूख इंजिनियर थोडे अडखळत होते. तेव्हा अंधश्रद्धा म्हणून मी आत गेलो. ज्या क्षणी मी आत गेलो, मला चौकार मारल्यानंतर लोकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून, मी आत राहण्याचा निर्णय घेतला. मी पडलो आणि झोपी गेलो. संघाचे व्यवस्थापक केन बॅरिंग्टन आले आणि त्यांनी मला जागे केले'', असे वाडेकरांनी या कसोटीची आठवण काढताना सांगितले होते. अशी रंगली कसोटी मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी १९ ऑगस्टपासून ओव्हल मैदानावर रंगणार होणार होती. मालिका जिंकण्यासाठी दोन्ही देशांना हा सामना जिंकणे आवश्यक होते. नाणेफेक जिंकलेल्या इंग्लंडने पहिल्या डावात ३५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २८४ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात खेळपट्टी आणि खेळ पूर्णपणे बदलला. फिरकीपटू भागवत चंद्रशेखर यांनी इंग्लंडची दाणादाण उडवली. त्यांनी दुसऱ्या डावात १०१ धावा केल्या. चंद्रशेखर यांनी ३८ धावात ६ बळी टिपले. भारताला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्य माफक होते. पण मंद आणि वळण घेणाऱ्या ओव्हल खेळपट्टीवर हे लक्ष्य साध्य करणे सोपे नव्हते. मात्र, चांगली गोष्ट अशी होती की भारताकडे पूर्ण दिवस होता. पण इंग्लिश कर्णधार इलिंगवर्थने प्रत्येकी एका धावेसाठी झुंज दिली. भारताने १३४ धावांवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. पण फारुख इंजिनिअर आणि आबिद अली विजयानंतरच पॅव्हेलियनमध्ये परतले. शेवटच्या ९७ धावा करण्यासाठी भारताला साडेतीन तास फलंदाजी करावी लागली. पण भारताचा ३९ वर्षांचा दुष्काळ संपला आणि सलग २६वी कसोटी जिंकण्याचे इंग्लंडचे स्वप्न धुळीस मिळाले.