लीड्स : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन डावांत मिळून ८०० हून अधिक धावा करुनही अखेरीस पराभव पत्करण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली. भारतीय गोलंदाजीतील मर्यादा या सामन्यातून अधोरेखित झाल्या. जसप्रीत बुमरा वगळता सर्वच वेगवान गोलंदाजांवर टीका झाली. मात्र, भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने गोलंदाजांची पाठराखण केली. भारतीय गोलंदाजीत सध्या अनुभवाची कमतरता असून त्यांना पाठिंबा देणे, त्यांच्यावर विश्वास राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे गंभीर म्हणाला.

लीड्स येथे झालेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने चौथ्या डावात ३७१ धावांचा यशस्वी पाठलाग केला. बुमराचा अपवाद वगळता भारतीय गोलंदाजांनी निराशा केली. प्रसिध कृष्णाने दोन डावांत मिळून पाच गडी बाद केले, पण त्याला धावांवर नियंत्रण राखता आले नाही. पहिल्या डावात २० षटकांत १२८ धावा, तर दुसऱ्या डावात १५ डावांत ९२ धावा त्याने धावा खर्ची केल्या. मोहम्मद सिराजने प्रयत्न केले, पण त्यालाही फारसे यश मिळाले नाही. शार्दूल ठाकूरही अचूक टप्पा राखण्यात अपयशी ठरला.

‘‘पूर्वी ४० हून अधिक कसोटी सामने खेळलेले तीन-चार गोलंदाज संघात असायचे. मात्र, आताचे चित्र वेगळे आहे. एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अनुभव फारसा महत्त्वाचा ठरत नाही. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये, तेही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिकेत खेळताना अनुभव निर्णायक ठरू शकतो,’’ असे गंभीर म्हणाला.

‘‘बहुतांश गोलंदाजांसाठी ही केवळ सुरुवात आहे. तुम्ही प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूविषयीचे मत बदलण्यास सुरुवात केल्यास नव्या गोलंदाजांना घडवायचे कसे? बुमरा आणि सिराज वगळता आमच्या संघातील वेगवान गोलंदाजांना कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. मात्र, त्यांच्यात क्षमता आणि गुणवत्ता नक्कीच आहे. त्यामुळेच ते ड्रेसिंग रुमचा भाग आहेत. त्यांच्यावर विश्वास दाखवणे, त्यांना पाठिंबा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही केवळ एका दौऱ्याचा विचार करू शकत नाही. आम्हाला असे वेगवान गोलंदाज तयार करायचे आहेत, जे येणाऱ्या वर्षांत भारताला सातत्याने कसोटी सामने जिंकवून देऊ शकतील,’’ असे गंभीरने नमूद केले.

सध्याच्या भारतीय संघाचा भाग असणाऱ्या वेगवान गोलंदाजांत बुमराने सर्वाधिक ४६ कसोटी सामने खेळले आहे. त्यापाठोपाठ सिराजचा (३७ सामने) क्रमांक लागतो. शार्दूलने १२ कसोटी सामने खेळले असले, तरी त्याला सातत्याने संधी मिळालेली नाही. प्रसिध (चार सामने), आकाश दीप (सात सामने), हर्षित राणा (दोन सामने) आणि अर्शदीप सिंग (एकही नाही) हे अन्य वेगवान गोलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये नवखे आहेत.

काही वेळा अपयश येणार

भारतीय संघाला दोन्ही डावांत तळाच्या फलंदाजांच्या अपयशाचा मोठा फटका बसला. भारताने पहिल्या डावात अखेरचे सात गडी ४१ धावांत, तर दुसऱ्या डावात अखेरचे सहा गडी ३१ धावांतच गमावले. त्यामुळे इंग्लंडला लढतीत पुनरागमन करता आले. ‘‘आमच्या तळाच्या फलंदाजांनी खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. काही वेळा तुम्हाला अपयश येते आणि हे समजण्यासारखे आहे. आम्ही ज्याप्रकारे झटपट गडी गमावले ते निराशाजनक होते, पण अन्य कोणाहीपेक्षा आमचे खेळाडूच अधिक निराश आहेत. पहिल्या डावात ५७०-५८० धावा करण्याची आमच्याकडे संधी होती. त्यानंतर आम्हाला लढतीत वर्चस्व राखता आले असते. मात्र, तसे झाले नाही. खेळाडू यातून शिकतील आणि आगामी सामन्यांत कामगिरी उंचावतील अशी आशा आहे,’’ असे गंभीरने नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुमराबाबतची योजना कायम

पहिल्या कसोटीतील पराभवानंतरही बुमराबाबतच्या योजनेत बदल झालेला नसल्याचे गंभीरने स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीदरम्यान बुमराला विविध दुखापतींचा सामना करावा लागला आहे. यावर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराच्या पाठीला दुखापत झाली. त्याला तीन महिन्यांहून अधिक काळ मैदानापासून दूर राहावे लागले. त्यामुळे कार्यभार व्यवस्थापनांतर्गत तो इंग्लंडविरुद्ध केवळ तीन सामने खेळणे नियोजित आहे. ‘‘आम्ही केवळ एका दौऱ्याचा विचार करू शकत नाही. आगामी काळात आम्हाला बरेच क्रिकेट खेळायचे आहे. बुमराचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. तो तीन कसोटी सामने खेळणार हे आधीच ठरले होते आणि तसेच होईल,’’ असे गंभीर म्हणाला.