अन्वय सावंत, लोकसत्ता

मुंबई : सर्फराज आणि मला एकत्रित भारतीय संघासाठी खेळताना पाहणे हे वडिलांचे (नौशाद खान) स्वप्न आहे. ते पूर्ण करण्याचा मी ध्यास घेतला आहे. मात्र, आता माझ्या कारकीर्दीची केवळ सुरुवात झाली आहे. मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, अशी भावना मुंबईचा युवा अष्टपैलू मुशीर खानने व्यक्त केली.

MS Dhoni Only Given Limited Batting In CSK Trainer Explains Why
MS धोनीला शेवटच्याच षटकांमध्ये फलंदाजी देण्याचं कारण अखेरीस आलं समोर; प्रशिक्षक म्हणाले, “त्याचे शॉट्स..”
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
MS Dhone fan buys 64000 tickets
मुलीच्या शाळेची फी भरली नाही, पण धोनीच्या चाहत्याने IPL तिकीटासाठी ६४ हजार खर्च केले
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

मुंबईच्या संघाने तुल्यबळ विदर्भाचे आव्हान परतवून लावताना आपली आठ वर्षांपासूनची रणजी जेतेपदाची प्रतीक्षा गुरुवारी संपवली. मुंबईने तब्बल ४२ व्यांदा रणजी करंडक उंचावला आणि या यशात १९ वर्षीय मुशीरचे योगदान अतिशय महत्त्वाचे ठरले. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर मुशीरने वरिष्ठ स्तरावर रणजी करंडकात आपल्यातील अलौकिक गुणवत्ता सिद्ध केली. उपांत्यपूर्व सामन्यात बडोदाविरुद्ध द्विशतक, उपांत्य सामन्यात तमिळनाडूविरुद्ध अर्धशतक आणि अंतिम सामन्यात विदर्भाविरुद्ध शतक झळकावण्याची दर्जेदार कामगिरी मुशीरने केली. मुशीरसाठी गेले काही महिने अविस्मरणीय ठरले असले तरी याबाबत समाधान मानण्यापेक्षा खेळात आणखी सुधारणा करण्याचा त्याचा मानस आहे.

हेही वाचा >>> WPL 2024: बंगळुरूची अंतिम फेरीत धडक, मुंबईचा ५ धावांनी पराभव करत रचला इतिहास

‘‘मी गेले वर्षभर क्रिकेट खेळत आहे. एकही दिवस असा नव्हता, जेव्हा मी सराव तरी केला नसेल किंवा सामना तरी खेळला नसेल. आम्ही घरी असताना वडीलच आमचा सराव करून घेतात. आमचे खूप व्यग्र वेळापत्रक असते. आम्ही सकाळी आणि संध्याकाळी सराव करतो. तसेच तंदुरुस्तीवर मेहनत घेतो. पुढेही आम्ही अशीच मेहनत घेत राहू,’’ असे मुशीर म्हणाला.

खान कुटुंबासाठी यंदाचे वर्ष खूपच खास ठरले आहे. अनेक वर्षे रणजी करंडकात सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर अखेर सर्फराजला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले. त्याने इंग्लंडविरुद्ध पदार्पणातच दोन्ही डावांत अर्धशतके साकारली. तर मुशीरने भारतीय युवा संघ आणि मुंबईसाठी अप्रतिम कामगिरी केली. १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत मुशीर (७ सामन्यांत ३६० धावा) दुसऱ्या स्थानी राहिला. मग रणजी करंडकाच्या बाद फेरीत तो मुंबईकडून सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज ठरला. त्याने तीन सामन्यांच्या पाच डावांत १०८.२५च्या सरासरीने तब्बल ४३३ धावा केल्या. आता कामगिरीत सातत्य राखण्याचे आणि मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत भारतीय संघाकडून खेळण्याचे ध्येय त्याने बाळगले आहे.

‘‘माझे एकच स्वप्न आहे आणि ते म्हणजे मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यांना मला आणि सर्फराजला देशासाठी एकत्रित खेळताना पाहायचे आहे. प्रत्येक क्रिकेटपटूप्रमाणेच माझेही भारतीय संघाकडून खेळणे हे ध्येय आहे. मात्र, या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मला अजून बराच प्रवास करायचा आहे. माझ्या कारकीर्दीची आता सुरुवात झाली आहे. मी प्रथमच रणजी करंडकात यशस्वी कामगिरी केली. अशीच कामगिरी मला सुरू ठेवयाची आहे,’’ असे मुशीरने सांगितले.

अंतिम सामन्यात वानखेडेच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर मुशीरने दुसऱ्या डावात ३२६ चेंडूंत १३६ धावांची खेळी केली. मग डावखुऱ्या फिरकीने त्याने दोन महत्त्वपूर्ण गडीही बाद केले. त्यामुळे अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी त्याची निवड करण्यात आली.

मी मूळचा गोलंदाज, फलंदाजी ‘बोनस’

मुशीरने भारतीय युवा संघ आणि मुंबईकडून फलंदाजीत चमक दाखवली असली, तरी मी मूळचा गोलंदाज आहे, फलंदाजी ही माझ्यासाठी ‘बोनस’ आहे, असे तो सांगतो. ‘‘मी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा मी गोलंदाज होतो. कालांतराने फलंदाजीवर अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली. मुंबई संघात बरेच अनुभवी गोलंदाज असल्याने मला गोलंदाजी करण्याची तितकीशी संधी मिळत नाही. परंतु कर्णधार चेंडू माझ्याकडे सोपवेल, तेव्हा बळी मिळवत किंवा धावा रोखत आपले योगदान देण्याचा माझा प्रयत्न असतो,’’ असेही मुशीरने सांगितले. मुशीरने रणजीच्या अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात अप्रतिम चेंडू टाकत खेळपट्टीवर ठाण मांडून असलेल्या करुण नायरचा (२२० चेंडूंत ७४ धावा) अडसर दूर केला होता.