वृत्तसंस्था, बुसान

भारतीय संघाने कबड्डीतील मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध करताना आशियाई अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकावले. कोरियातील बुसान येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शुक्रवारी भारतीय पुरुष संघाने कडवी झुंज देणाऱ्या इराणला ४२-३२ अशा फरकाने पराभूत केले. भारताने नऊ पर्वात आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली.भारतीय संघाने या स्पर्धेत वर्चस्वपूर्ण कामगिरी करताना आपले पाचही साखळी सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आणि अंतिम फेरीत इराणचे आव्हान परतवून लावले.

अंतिम लढतीत भारताने दमदार सुरुवात केली. दहाव्या मिनिटाला भारताने इराणवर लोण दिला. कर्णधार पवन सेहरावतने खोलवर चढाई करताना इराणच्या दोन खेळाडूंना बाद करत भारताला १०-४ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर आणखी एक लोण चढवताना भारताने मध्यंतरापर्यंत आघाडी २३-११ अशी वाढवली.

उत्तरार्धात अपेक्षेप्रमाणे इराणने खेळ उंचावला. मात्र, भारतानेही वेगवान खेळ सुरू ठेवताना पुन्हा इराणवर लोण देत ३३-१४ अशी आघाडी भक्कम केली. यानंतर मात्र इराणने पुनरागमन केले. दोन मिनिटे शिल्लक असताना इराणने भारताची आघाडी ३८-३१ अशी कमी केली. त्या वेळी केवळ अस्लम इनामदार मॅटवर शिल्लक होता. परंतु इराणचा कर्णधार मोहम्मदरेझा शाबलोउई चियानेला अस्लमला बाद करण्यात अपयश आल्याने भारताला ‘सुपर टॅकल’चे तीन गुण मिळाले. त्यामुळे भारताचा विजय सुनिश्चित झाला.

सहा संघांचा सहभाग

आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत भारतासह इराण, जपान, कोरिया, चायनीज तैपेई आणि हाँगकाँग या संघांचा सहभाग होता. भारताने या स्पर्धेतील सर्वात मोठा विजय कोरियाविरुद्ध ७६-१३ असा मिळवला. तर साखळी सामना आणि अंतिम सामन्यात इराणने भारताला कडवी झुंज दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशियाई क्रीडा स्पर्धेकडे लक्ष

भारतीय कबड्डी संघ आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चीनमधील हांगझो येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदवेल. २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेच्या गेल्या पर्वात भारताला उपांत्य फेरीत इराणकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे यंदा त्या पराभवाची परतफेड करतानाच सुवर्णपदक जिंकण्याचे भारताचे लक्ष्य असेल.