कर्णधार जो रूट वगळता इंग्लंडच्या अन्य फलंदाजांवर भारतीय गोलंदाजांनी सुरेख नियंत्रण मिळवले. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव तिसऱ्या दिवसअखेर फक्त २७ धावांची आघाडी घेऊन ३९१ धावांवर संपुष्टात आला. रूटने झुंजार नाबाद १८० धावांची खेळी साकारली. दरम्यान भारताच्या एका गोलंदाजाची सध्या इंग्लंडमध्ये जोरदार चर्चा आहे. विराट कोहलीला डीआरएस घेण्यासाठी विनंती करणं असो किंवा मग तोडांवर बोट ठेवून सेलिब्रेशन कऱणं…मोहम्मद सिराज सध्या चर्चेच विषय ठरला आहे.

२७ वर्षीय मोहम्मद सिराज विकेट घेतल्यानंतरही सेलिब्रेशन करताना दिसत नाही आहे. आपल्या या कृतीतून मोहम्मद सिराज टीकाकारांना शांत राहा असा अप्रत्यक्ष संदेश देत असल्याचं बोललं जात आहे.

Ind Vs Eng Test: सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या केएल राहुलसोबत गैरवर्तन; प्रेक्षकांमधून फेकले शॅम्पेनचे कॉर्क

“माझं हे सेलिब्रेशन टीकाकारांसाठी आहे. कारण मी हे करु शकत नाही, ते करु शकत नाही अशा अनेक गोष्टी ते माझ्याबद्दल खूप काही बोलत होते. मी माझ्या गोलंदाजीतूनच बोलणार आहे. आणि हो ही माझी सेलिब्रेशन करण्याची नवी स्टाइल आहे,” असं सिराजने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेनंतर बोलताना म्हटलं. सिराजने लॉड्सवर पहिल्यांदाच खेळताना चार विकेट्स मिळवल्या.

T20 वर्ल्डकप: १० सप्टेंबरपर्यंत खेळाडूंची यादी पाठवा; आयसीसीची सूचना

दरम्यान भारताचा फलंदाज राहुलवर ६९व्या षटकात सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना दारूच्या बाटल्यांच्या झाकणांचा मारा करण्यात आला. राहुलने याविषयी पंचांना कळवल्यावर काही वेळासाठी खेळ थांबवण्यात आला. परंतु राहुलवर हे कोणी फेकले, हे समजू शकलेले नाही.

याबद्दल सिराजला विचारण्यात आलं असताना त्याने नेमकं काय झालं याची आपल्याला माहिती नसून लोकांकडून कोणतीही आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे. तसंच यावेळी त्याने चार जलद गोलंदाज खेळवण्याचा फायदा सांगितला. “चार जलद गोलंदाज खेळवणं खूप महत्वाचं होतं. कारण आम्ही सुरुवातीला तीन विकेट घेतले. जलद गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते,” असं त्याने सांगितलं.