मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) मला १९६५-६६मध्ये सर्वोत्तम कनिष्ठ क्रिकेटपटूचा पुरस्कार दिला नाही. त्याच प्रेरणेने मला घडवले आणि येथे विशेष अतिथी कक्षासह मला सन्मानित करण्यात आले. मुंबईचे क्रिकेट हे माझे मायबाप आहे, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ‘एमसीए’चे आभार मानले. माजी क्रिकेटपटू माधव मंत्री जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून वानखेडे स्टेडियमवरील माजी कर्णधार सुनील गावस्कर विशेष अतिथी कक्ष आणि माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर प्रेक्षक गॅलरीचे उद्घाटन शुक्र वारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी क्रिकेटपटू गुंडप्पा विश्वनाथ, सचिन तेंडुलकर आणि महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. ‘‘१९९१मधील हरयाणाविरुद्ध झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत दोन धावांनी मुंबईने निसटता पराभव पत्करला. या सामन्यात खडूसपणा काय असतो ते मुंबईने दाखवून दिले. हा सामना गमावल्यानंतर वेंगसरकर यांच्या डोळ्यांत अश्रू होते. त्यांच्या संस्मरणीय खेळीचा सन्मान ‘एमसीए’ने या स्टँडनिशी केला आहे,’’ असे सचिनने सांगितले. ‘‘मुंबई क्रिकेट संघटनेचा कनिष्ठ क्रिकेटपटूसाठीचा पुरस्कार हुकल्याबद्दल मला अतिशय दु:ख झाले होते. परंतु गावस्कर यांनी पाठवलेल्या पत्राने मला प्रेरणा दिली. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, तू ‘एमसीए’च्या कनिष्ठ क्रिकेटपटूंच्या पुरस्कार विजेत्यांची यादी पाहा, यात एका क्रिकेटपटूचे नाव नाही. परंतु त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरी कामगिरी के ली आहे,’’ असे सचिन म्हणाला. ‘‘गावस्कर यांच्यासारखा सलामीवीर तसेच विश्वनाथ आणि सचिन यांच्यासारखे मधल्या फळीतील फलंदाज वारंवार घडत नाहीत,’’ असे उद्गार वेंगसरकर यांनी काढले.