१९६४च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे संघनायक चरणजीत सिंह यांचे गुरुवारी उना (हिमाचल प्रदेश) येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजारपण आणि हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. १९६०च्या ऑलिम्पिकमध्ये चरणजीत यांनी अप्रतिम कामगिरी केली. परंतु दुखापतीमुळे त्यांना अंतिम सामन्याला मुकावे लागले आणि पाकिस्तानकडून भारताने ०-१ असा निसटता पराभव पत्करला. मग १९६४मध्ये चरणजीत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला १-० असे नमवून ऐतिहासिक विजेतेपद पटकावले होते. १९६२च्या आशियाई स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघामध्येही त्यांचा समावेश होता. हॉकीमधून निवृत्तीनंतर ते हिमाचल प्रदेश विद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात संचालक म्हणून कार्यरत होते.