ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर सध्या सर्वस्तरातून भारतीय संघावर टीका होते आहे. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे चाहते नाराज झाले असून अनेक माजी खेळाडूंनीही टीम इंडियाला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही संधी साधत टीम इंडियाची खिल्ली उडवली आहे.

अवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुलला भारतीय संघात स्थान मिळायला हवं – मोहम्मद कैफ

मी झोपेतून जागा झालो तर मला ३६९ असा आकडा दिसला. पण नंतर नीट पाहिलं तेव्हा ३६/९ अशी परिस्थिती होती. मलाही यावर विश्वास बसला नाही आणि मी झोपून गेलो, अशा शब्दांमध्ये शोएबने भारतीय संघावर टीका केली आहे. इतकच नव्हे तर कसोटी क्रिकेटमधला पाकिस्तानचा निच्चांकी धावसंख्येचा विक्रमही भारताने मोडल्याचं म्हणत शोएबने विराटसेनेचं कौतुक केलं आहे.

पहिला सामना संपल्यानंतर विराट कोहली भारतात परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व येईल. २६ डिसेंबरपासून भारतीय संघ आपला दुसरा कसोटी सामना खेळेल. पृथ्वी शॉचा खराब फॉर्म, मोहम्मद शमीचं दुखापतीमुळे संघाबाहेर जाणं यामुळे अंतिम ११ जणांचा संघ निवडताना भारतीय संघ व्यवस्थापनासमोर मोठा पेच असणार आहे.

अवश्य वाचा – Video : साहाने केलेला रन आऊट पाहून तुम्हालाही धोनीची आठवण येईल