वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेत भारताने २-० ने बाजी मारत, दौऱ्याचा शेवट गोड केला. या दौऱ्यात गोलंदाजांनी केलेला भेदक मारा, उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला गवसलेला सूर आणि मधल्या फळीत हनुमा विहारीने गरजेच्यावेळी केलेली संयमी खेळी हे महत्वाचे मुद्दे ठरले. हनुमा विहारीनेही आपल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

“या मालिकेत मी चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे. मी एकावेळा एका कसोटी सामन्याचा विचार करतो. प्रत्येक सामना अखेरचा सामना आहे असं समजूनच मी मैदानात उतरतो. असा विचार मनात ठेवून मैदानात उतरलं की प्रत्येक वेळी चांगली खेळी करण्यासाठी तुम्हाला उर्जा मिळत जाते.” हनुमा विहारी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेनंतर कर्णधार विराट कोहलीनेही हनुमाच्या खेळाचं कौतुक केलं होतं.

अवश्य वाचा – लोकेश राहुलच्या कसोटी संघातील स्थानावर गंडांतर? नवीन प्रशिक्षकांकडून सूचक संकेत

संघ व्यवस्थापन आणि कर्णधार तुमच्यावर विश्वास दाखवतं आणि तो तुम्ही सार्थ करुन दाखवता यासारखी चांगली भावना कोणत्याही खेळाडूसाठी नसेल. विराटने माझं केलेलं कौतुक हा माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण होता, हनुमा विहारी विंडीज दौऱ्यात आपल्या खेळाविषयी बोलत होता. विंडीज दौऱ्यात हनुमा विहारी एक शतक आणि दोन अर्धशतकं झळकावलं.