आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत गुरुवारी भारत आणि बांगलादेश हे दोन आशियाई संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. बर्मिंगहॅममध्ये होणाऱ्या उपांत्य फेरीचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात भारतावर दबाव आणण्यासाठी बांगलादेशकडून रणनिती आखली जाते आहे. भारताची सलामीची जोडी जबरदस्त फॉर्मात असल्याने ही जोडी लवकरात लवकर फोडून भारताच्या मधल्या फळीवर दबाव आणण्याची रणनिती बांगलादेशने आखली आहे. विशेष म्हणजे युवराज सिंगला ‘लक्ष्य’ करण्याची तयारी बांगलादेशने केली आहे.

मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग भारताची कमकुवत बाजू असल्याचे बांगलादेशी संघाला वाटते. युवराज कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला असला, तरी त्यामुळे त्याच्या क्षेत्ररक्षणावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच क्षेत्ररक्षणादरम्यान युवराजवर दबाव आणण्याचा बांगलादेशकडून केला जाणार आहे. भारताची फलंदाजी जबरदस्त फॉर्मात असल्याने बांगलादेशची चिंता वाढली आहे. त्यामुळे रोहित शर्मा-शिखर शर्माची जोडी लवकर फोडून फलंदाजीसाठी येणाऱ्या कर्णधार विराट कोहलीवर दडपण आणण्याची बांगलादेशची व्यूहनिती आहे. भारताची मधली फलंदाजी तितकीशी मजबूत नसल्याचा निष्कर्ष बांगलादेशने काढला आहे. त्यामुळेच सलामीवीरांना लवकर गुंडाळून भारताच्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचा बांगलादेशचा मनसुबा आहे. मात्र हे डावपेच मैदानावर प्रत्यक्षात येणे अतिशय अवघड दिसते आहे.

भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी बांगलादेश चार वेगवान गोलंदाजांना खेळवण्याची शक्यता आगहे. कर्णधार मश्रफी मुर्ताझा, तस्कीन अहमद, रुबेल हुसेन आणि मुस्तफिजुर रेहमान या चार गोलंदाजांसह बांगलादेशी संघ मैदानात उतरण्याची सर्वाधिक शक्यता आहे. इंग्लंडच्या वातावरणात वेगवान गोलंदाज भारतीय फलंदाजांना वेसण घालतील, अशी आशा बांगलादेशी संघ बाळगून आहे. गोलंदाजांचा वेग आणि आक्रमकता यांच्या जोरावर वरचढ ठरण्याची रणनिती बांगलादेशने आखली आहे. बांगलादेशचे प्रमुख प्रशिक्षक चंडिका हाथुरुसिंघा संघाच्या रणनितीमध्ये जातीने लक्ष घालत आहेत. बांगलादेशचा संघ भारतीय संघाला नमवेल, अशी आशा हाथुरुसिंघा यांना आहे. भारतीय संघ पूर्णपणे दबावाखाली असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे.

आतापर्यंत बांगलादेशचा संघ कधीही आयसीसीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेला नाही. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशचा संघ उपांत्यपूर्व फेरीत भारतासमोर होता. मात्र मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा १०९ धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्याचे बांगलादेशचे स्वप्न भंगले होते.