ICC World Test Championship 2025-2027: कसोटी क्रिकेट म्हटलं की पाच दिवस दोन संघांमध्ये अटीतटीची क्रिकेट पाहण्याचा रोमांच अनुभवायला मिळणार हे निश्चित होतं. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये रस्सीखेच आपल्याला पाहायला मिळते. पण आता यातच मोठा बदल होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या चक्राला सुरूवात झाली आहे आणि आता या चक्रामध्ये कसोटी सामन्याचे दिवस कमी करण्यात येणार आहेत.

आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ साठी एक मोठा निर्णय घेणार आहे. कसोटी सामना ५ ऐवजी ४ दिवसांचा खेळवला जाणार आहे. या निर्णयाचा परिणाम सर्व संघांवर होणार नाही, परंतु कसोटी क्रिकेट आणखी मनोरंजक बनवण्याचा हा प्रयत्न आहे. आयसीसी लवकरच यावर अंतिम निर्णयाची घोषणा करणार आहे.

कसोटी सामना आता ५ ऐवजी ४ दिवसांमध्ये खेळवला जाणार आहे. द गार्डियनचा एक अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की आता लहान देशांसाठी चार दिवसांचे कसोटी सामने आयोजित केले जाऊ शकतात. या निर्णयामागचा मुख्य हेतू म्हणजे लहान देश देखील सतत कसोटी क्रिकेट खेळू शकतील.

आयसीसी अध्यक्ष जय शाह अलीकडेच इंग्लंडमध्ये होते, जिथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीचा अंतिम सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवण्यात आला होता. असं म्हटलं जातंय की, जय शाह यांनी यामध्ये चार दिवसांच्या कसोटीसाठी सहमती दर्शविली आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या संघांमधील कसोटी मालिका ही प्रत्येकी पाच दिवसांची असेल, परंतु जेव्हा हे संघ लहान देशांविरुद्ध खेळतील तेव्हा सामन्यांचे दिवस चार दिवसांपर्यंत कमी केले जातील. २०१७ मध्येच आयसीसीने चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मान्यता दिली होती, परंतु हे सामने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नव्हते.

अलीकडेच इंग्लंडने झिम्बाब्वेविरुद्ध चार दिवसांचा कसोटी सामना खेळला. पण हा WTC चक्रातील सामना नव्हता. म्हणजेच, या सामन्यातील विजय किंवा पराभवाचा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेवर कोणताही परिणाम होणार नव्हता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ मात्र पाच दिवसांच्या सामन्यांच्या स्वरूपाप्रमाणे सुरू राहील. मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने त्याची सुरुवात होईल. WTC 2025-27 मध्ये नऊ देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या २७ कसोटी मालिकांपैकी १७ मालिका या फक्त दोन सामन्यांच्या मालिका असतील तर तीन सामन्यांच्या ६ मालिका खेळवल्या जातील.