नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात आलेल्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) साधारण दर्जा दिला आहे. ‘आयसीसी’ सामनाधिकारी झिम्बाब्वेचे माजी फलंदाज अँडी पायक्रॉफ्ट यांनी मैदानाला (आऊटफिल्ड)मात्र ‘सर्वोत्तम’ दर्जा दिला आहे.

संथ खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव करताना विजेतेपद मिळविले होते. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर ऑस्ट्रेलियाने भारताला ५० षटकांत २४० धावांत रोखले होते. ऑस्ट्रेलियाने ४३ षटकांत लक्ष्य गाठले होते. सलामीचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडने १२० चेंडूंत १३७ धावा केल्या होत्या.

हेही वाचा >>> U19 Asia Cup : सोलापूरचा पठ्ठ्या दुबईत चमकला, भारताला मिळाला नवा अष्टपैलू खेळाडू, नाबाद खेळी करत अफगाणिस्तानला नमवलं

विश्वचषक क्रिकेट स्पर्धा झाल्यानंतर ‘आयसीसी’ने आता मैदानाच्या दर्जाबाबतचा अहवाल जाहीर केला. त्यानुसार कोलकाता, लखनऊ, अहमदाबाद आणि चेन्नई येथे दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या भारताच्या सामन्यांसाठी वापरण्यात आलेल्या सर्व खेळपट्टींना ‘साधारण’ दर्जा दिला आहे. अशाच प्रकारचा ‘साधारण’ दर्जा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिकादरम्यान झालेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीतील ईडन गार्डन्सच्या मैदानावरील खेळपट्टीला मिळाला आहे.  ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला

४९.४ षटकांत २१२ धावांत गारद केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ४७.२ षटकांतच ७ गडी गमावून हे लक्ष्य गाठले होते. या सामन्याचे ‘आयसीसी’ सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी मैदानाला (आऊटफिल्ड) मात्र ‘सर्वोत्तम’ दर्जा दिला आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वानखेडे सर्वोत्तम

वानखेडे मैदानावर उपांत्य फेरीसाठी भारत व न्यूझीलंडदरम्यान झालेल्या सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला मात्र ‘सर्वोत्तम’ दर्जा मिळाला आहे. विशेष म्हणजे ऐन वेळी जुनीच खेळपट्टी निवडल्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनावर त्या वेळी टीका करण्यात आली होती.