“टी२० विश्वचषकापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलचा फॉर्म चिंतेचा विषय होता. पण कोहलीने केलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या खेळीने तो पुन्हा परत आला असून आता विराटला यानंतर कोणीही स्वप्नात सुद्धा आउट ऑफ फॉर्म समजू शकत नाही. ”, असे विधान सुनील गावसकर यांनी केले, रोहित लवकर बाद होत असून काही काळानंतर क्रिकेटमध्ये परतलेला राहुललाही त्याच्या फलंदाजीतील सूर म्हणावा तसा गवसलेला दिसत नाही, यावर सुनील गावसकर यांनी काही खास सूचना दिल्या आहेत.

राहुलने सराव सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली पण मोठ्या सामन्यांमध्ये अजूनही म्हणावी तशी खेळी झालेली नाही. रोहित अजूनही त्याच स्थितीवर आहे ज्याप्रमाणे तो विश्वचषकापूर्वी होता. भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर म्हणतात की, “टी२० विश्वचषकात कर्णधाराचा फॉर्म ही भारतासाठी एकमेव चिंतेची बाब आहे.”

रोहितला फलंदाजीतील सूर न गवसणे हीच चिंतेची बाब

रोहित आणि राहुल दोघेही पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरले. पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात रोहितला केवळ ४ धावा करता आल्या होत्या, कसे तरी करून शाहीनची षटके खेळून काढायची एवढच त्याच्या डोक्यात होतं. टीव्ही टू डे नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सुनील गावसकर म्हणाले की, “भारताची एकमात्र चिंता ही आहे की रोहित शर्माने अलीकडे त्याच्या क्षमतेनुसार धावा केल्या नाहीत, कारण आम्ही त्याला ओळखतो. मला वाटते की त्याने चांगली कामगिरी केली तर इतर खेळाडूंवरील दडपण कमी होईल.”

नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी गावसकर म्हणाले की, “भारतीय कर्णधाराचा फॉर्म ताबडतोब सुधारण्याची गरज आहे. रोहितचा फॉर्म ही खरोखरच चिंतेची बाब असून आपण जितके त्याला ओळखतो तितक्या क्षमतेने त्याने धावा केल्या नाहीत. मला असे वाटते की जर त्याने पुढील उत्तम कामगिरी केली तर बाकीच्या खेळाडूंना त्याचे अनुसरण करणे खरोखर सोपे होईल. विश्वचषक हे एक उत्तम व्यासपीठ आहे जिथे खेळण्यासाठी प्रत्येकजण स्वप्न पाहतो. तुम्ही चांगले सुरुवात देता त्याचा परिणाम येणाऱ्या पुढील फलंदाजांवर पडतो.”

हेही वाचा :  T20 World Cup: भारतीय संघ नाराज? सराव करण्यास नकार, जाणून घ्या नेमकं काय घडलंय?

“त्यांना चांगल्या लयीची गरज असून, डाव स्थिर करण्यासाठी थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध ३१ धावांत चार गडी गमावले त्यामुळे संघ अडचणीत सापडला, हेच जर तुम्ही थोडी हळू सुरुवात केली तरी, १ गडी गमावल्यानंतर ४० धावा जरी केल्या तरी तुम्ही १७० ते १८० चा आकडा सहज गाठू शकता. जे ३१/४ पेक्षा कधीही चांगलेच आहे.” असा सल्ला सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला दिला.