टीम इंडियाचा आजपासून क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाविरुद्ध सराव सामना सुरु होणार होता. पण वरुणराजाने हजेरी लावत सामन्यातील पहिल्या तीन-चार तासांचा खेळ वाया घालवला. पहाटे साडे पाच वाजता हा सामना सुरू होणार होता, परंतु पावसाच्या हजेरीने सामना सुरुच झाला नाही. त्यामुळे भारताच्या सरावावर पाणी फेरले गेले. पण तसे असले तरी विराटसेनेने तो वेळ सत्कारणी लावत एक शक्कल लढवली. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करण्यापूर्वी भारतासाठी हा सराव सामना महत्त्वाचा होता. पण पावसाच्या आगमनाने खेळ वाया जात असल्याने समजताच भारतीय खेळाडू शांत बसले नाहीत. पावसामुळे मैदानात जाण्यात अर्थ नसल्याने खेळाडूंनी थेट जिममध्ये धाव घेतली आणि व्यायाम करत वेळेचा सदुपयोग केला. विराटने या संदर्भातील एक फोटो ट्विट केला आहे. The rain doesn't seem to be going away so we decided to make something of our day. Gotta love a good workout with the boys. #makeeverydaycount pic.twitter.com/E94yPIcpRv — Virat Kohli (@imVkohli) November 28, 2018 या फोटोमध्ये कोहलीबरोबरच गोलंदाज इशांत शर्मा आणि सलामीवीर मुरली विजय हेदेखील जिममध्ये होते. त्यांनी हा वेळ सत्कारणी लावला आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने 'वर्कआऊट' केले. भारताला यंदाच्या वर्षात दक्षिण आफ्रिका (१-२) आणि इंग्लंड (१-४) या दोन्ही दौऱ्यावर कसोटी मालिकेत पराभव पत्करावा लागला त्यामुळे वर्षातील मालिकेत विजयी सलामी देण्याचा भारतीय संघाचा मानस आहे.