आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांच्या डावाला खिंडार पाडलं. उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या भारताच्या जलदगती त्रिकुटाने अवघ्या ३८ धावांमध्ये बांगलादेशचा निम्मा संघ माघारी धाडला. या सामन्यात भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहाने धोनीच्या कामगिरीशी बरोबरी केली.

वृद्धीमान साहाने कसोटी क्रिकेटध्ये यष्टींमागे आपल्या शंभराव्या बळीची नोंद केली. बांगलादेशचा सलामीवीर शादमान इस्लामचा झेल साहाने यष्टींमागे पकडत धोनीच्या सर्वात कमी कसोटी सामन्यांत शंभर बळी घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

सर्वात कमी कसोटी सामन्यात १०० बळी घेणारे भारतीय यष्टीरक्षक –

  • महेंद्रसिंह धोनी/वृद्धीमान साहा – ३५ कसोटी
  • किरण मोरे – ३९ कसोटी
  • नयन मोंगिया – ४१ कसोटी
  • सय्यद किरमाणी – ४२ कसोटी

बांगलादेशच्या आघाडीच्या फळीतले ३ फलंदाज हे भोपळाही न फोडता माघारी परतले. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सत्रावर आपलं वर्चस्व गाजवत बांगलादेशला बॅकफूटवर ढकललं.

अवश्य वाचा – Video : उडता पंजाब नाही उडता ‘हिटमॅन’ ! रोहितने घेतलेला अफलातून झेल एकदा पाहाच