लीड्स कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर आटोपला. या खराब कामगिरीनंतर प्रश्न निर्माण होत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. वॉनने लीड्समधील भारतीय फलंदाजांच्या आणि विशेषतः चेतेश्वर पुजाराच्या विचारसरणीवर मोठे वक्तव्य केले आहे. लीड्समध्ये टीम इंडियाकडे बघून असे वाटते, की ते हा सामना जिंकण्यासाठी खेळत नाहीत, असे वॉनने म्हटले. बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल पॉडकास्टशी बोलताना मायकेल वॉन म्हणाला, ''टेस्ट सीरिजमध्ये भारत १-०ने पुढे आहे. लीड्सनंतर आणखी दोन टेस्ट खेळायच्या आहेत. टीम इंडियाच्या मनात कुठेतरी, आम्हाला हा सामना नको आहे, असे वाटते. भारतीय संघ आता विजयानंतर हा सामना ड्रॉ करण्याचा विचार करत आहे, पण विराट कोहलीचा विचार वेगळा आहे. जर त्यांनी दुसऱ्या डावात मोठ्या धावा केल्या तर सामन्याचा निकाल काहीही लागू शकतो.'' हेही वाचा - ENG vs IND : …म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंनी आपल्या दंडावर बांधली ‘काळी’ पट्टी मायकेल वॉनने खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या चेतेश्वर पुजारावरही वादग्रस्त विधान केले. पुजारा लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात फक्त एक धावा करू शकला. तो म्हणाला, ''पुजाराचे डोके फिरले आहे आणि तो त्याचे तंत्र विसरला आहे. तो फक्त क्रीजवर उभे राहण्यासाठी खेळतो. अँडरसनने चांगला स्विंग केला आणि पुजारावरही दडपण होते.'' चेतेश्वर पुजारा गेल्या दोन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. केवळ वॉनच नाही, इतर क्रिकेट तज्ज्ञही आता त्याला धारेवर धरत आहेत.