India vs New Zealand, ICC World Cup 2023: विश्वचषक २०२३च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना करण्यापूर्वी टीम इंडिया पूर्णपणे तयार आहे. न्यूझीलंड हा सर्वात शिस्तप्रिय संघांपैकी एक असल्याचे मत कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केले. पण त्याचप्रमाणे भारतालाही विरोधी संघाची मानसिकता कळते, असेही तो म्हणाला. विश्वचषक २०१९ नंतर, भारत आणि न्यूझीलंड पुन्हा एकदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येणार असून १५ नोव्हेंबरला एकमेकांशी दोन हात करणार आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत संघाची रणनीती स्पष्ट केली. मुंबईत होणाऱ्या सामन्यासाठी भारत कदाचित प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल करणार नाही. रोहित शर्माने आपल्या भाषणाची सुरुवात सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन केली. तो म्हणाला, “पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत, जेव्हाही तुम्ही विश्वचषक खेळत असाल तेव्हा तुमच्यावर दबाव असतोच. पण आम्ही ज्या पद्धतीने दबाव हाताळला ते कौतुकास्पद आहे. आम्हाला असाच खेळ पुढे चालू ठेवायचे आहे. भारतात तुमच्यावर नेहमीच दबाव असतोच आणि पुढेही असेल. आम्ही बाहेर काय सुरु आहे हे अजिबात ऐकत नाही. आम्ही फक्त आमच्या खेळावर लक्ष केंद्रित करू इच्छितो.” न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचे टीम कॉम्बिनेशन काय असेल? भारतीय कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धची रणनीती स्पष्ट केली. “हार्दिकला दुखापत होताच आमचे टीम कॉम्बिनेशन बदलले.” तो सहाव्या गोलंदाजीच्या पर्यायाबद्दल पुढे म्हणाला, “हार्दिक हा पहिल्या क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू होता. त्याच्या जाण्याने आम्हाला गोलंदाजासाठी इतरांचा वापर करावा लागत आहे. भारतासाठी हार्दिक सारखा पर्याय मिळणे म्हणजे संघाचे नशीब आहे. मात्र, तो लवकरात लवकर बरा व्हावा हीच सदिच्छा. मला आशा आहे की आम्हाला पाच गोलंदाजांव्यतिरिक्त इतर पर्याय वापरावे लागणार नाहीत.” हेही वाचा: IND vs NZ: “ही मुले खूप हुशार आहेत, आम्ही त्यांच्याइतके…”, सेमीफायनलआधी कपिल देव यांनी टीम इंडियाचे केले कौतुक भारत vs न्यूझीलंड सामन्याबाबत रोहित शर्मा काय म्हणाला? उपांत्य फेरीतील न्यूझीलंडशी झालेल्या आधीच्या आणि उद्याच्या लढतीबद्दल भारतीय कर्णधार म्हणाला, “जेव्हाही आम्ही न्यूझीलंडचा सामना केला आहे, तेव्हा ते सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून समोर आले आहेत. ते त्यांचे क्रिकेट हुशारीने खेळतात. त्यांना त्यांच्या विरोधकांची मानसिकता समजते आणि आम्हालाही ती कळते. २०१५ पासून ते सातत्याने उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी खेळत आहेत. आम्ही देखील गेले चार विश्वचषक उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहचलो आहोत.” भारताचे लक्ष फक्त विजयावर आहे रोहित शर्मा म्हणाला, “हे या संघाचे सौंदर्य आहे. १९८३ मध्ये आम्ही विश्वचषक जिंकला तेव्हा आमचा जन्मही झाला नव्हता. २०११ मध्ये जेव्हा आम्ही जिंकलो तेव्हा आताच्या संघातील निम्मे खेळाडू त्यात खेळत नव्हते. आम्ही आमचे मागील विश्वचषक कसे जिंकले, याबद्दल ते बोलताना मला दिसत नाही. आपण आता कसे चांगले खेळू शकतो आणि त्यात सुधार करू शकतो यावर ते लक्ष केंद्रित करत आहेत. सध्याच्या पिढीतील खेळाडूंचे हे खरे विचारांचे सौंदर्य आहे. आमचे पहिले ध्येय म्हणजे सामना जिंकणे हे आहे.” हेही वाचा: IND vs NZ Semi-final: भारत-न्यूझीलंड सेमीफायनलसाठी ICCने समालोचन पॅनेलची केली घोषणा; जाणून घ्या संपूर्ण यादी सांघिक कामगिरीकडे लक्ष दिले धरमशाला येथील सामन्यानंतर भारतीय संघाला विश्रांती देण्यात आली. लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा ब्रेक मिळाला होता. कर्णधार रोहित या ब्रेकबद्दल हसला आणि म्हणाला, “आम्ही एक गुप्त फॅशन शो देखील केला होता ज्याची सुदैवाने कोणालाही माहिती नव्हती. सुरुवातीपासूनच ड्रेसिंगरूममध्ये आम्ही चांगले वातावरण ठेवले आहे. आम्ही संघातील सर्व खेळाडूंना मुक्त विचार करण्याचे स्वातंत्र्य दिले. कोणावरही दबाव निर्माण केला नाही.” वानखेडेबद्दल काय म्हणाला रोहित शर्मा? विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये भारतीय संघाने श्रीलंकेला हरवून विश्वचषक २०११चे विजेतेपद पटकावले होते. वानखेडेबद्दल रोहित शर्मा म्हणाला, “मी येथे खूप क्रिकेट खेळलो आहे. शेवटच्या चार-पाच सामन्यांनंतरही मला वानखेडेच्या खेळपट्टीबद्दल अंदाज आलेला नाही. त्यामुळे इथे नाणेफेकीने काही फरक पडणार नाही. इतिहास काय आहे याने आम्हाला कुठलाही फरक पडत नाही, आमचे लक्ष्य विश्वचषक जिंकण्यावर आहे.”