२०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली दीर्घ रजेवर गेला होता. तो न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेतही खेळला नाही. २५ नोव्हेंबरपासून कानपूर येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीतही तो भाग घेणार नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. मात्र ३ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत तो संघात पुनरागमन करेल. क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्येही त्याची तयारी सुरू झाली. विराटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो मैदानात धावताना दिसत आहे.

पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही विराटचा फोटो शेअर केला आहे. ”गेले काही दिवस, सकाळी उठून विराट कोहलीची फलंदाजी पाहणे हा निव्वळ आनंद आहे. एक उच्चभ्रू खेळाडू आपल्या कलाकुसरीचा गौरव करत आहे. चॅम्पियन बनण्यासाठी लागणारा घाम आणि मेहनत आपण अनेकदा विसरतो. ट्रोलिंग सोपे आहे, परिपूर्णता प्राप्त करणे म्हणजे तपस्या”, असे राजदीप यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

काही क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून कोहलीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो किट बॅग घेऊन उभा दिसत आहे. विराट कोहलीने २३ नोव्हेंबर २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचे शतक केले. त्यानंतर कोलकाता येथे बांगलादेशविरुद्धच्या पिंक बॉल कसोटीत त्याने शतक झळकावले. तेव्हापासून ७३२ दिवस उलटून गेले आहेत आणि कोणत्याही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी२०) त्याला शतक झळकावता आलेले नाही. न्यूझीलंडविरुद्ध शतकाचा दुष्काळ संपवण्यासाठी विराट प्रयत्न करणार आहे.

विराटने इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका खेळली. इंग्लंडचा दौरा त्याच्यासाठी फारसा चांगला गेला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर तो वारंवार बाद होत होता. त्याला या मालिकेत एकही शतक झळकावता आले नाही. त्याने इंग्लंडविरुद्धच्या ४ कसोटीत २१८ धावा केल्या.

हेही वाचा – PHOTOS : लग्नाच्या दोन दिवसानंतर ‘स्टार’ क्रिकेटपटूचा भारताला अलविदा; बायको म्हणाली, “नवऱ्याला…”

इंग्लंड दौऱ्यात कोहलीवर त्याच्या तंत्राबद्दल जोरदार टीका झाली होती. यानंतर सुनील गावसकर यांनी त्याला माजी खेळाडूंची मदत घेण्याचा सल्ला दिला. गेल्या शतकापासून विराट कोहलीने १२ सामन्यांत ५६३ धावा केल्या आहेत. त्याने केवळ ५ अर्धशतके झळकावली असून त्याचा स्ट्राईक रेटही घसरला आहे. विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये गेल्या ५६ डावांमध्ये एकही शतक झळकावलेले नाही.