India vs Pakistan Bilateral series: नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तान दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी लाहोर येथे एकत्र सामनाही पाहिला. यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआय अधिकाऱ्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर दोन्ही देशातील चाहत्यांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होईल अशी आशा निर्माण झाली. यावर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी याबाबत सूचक विधान भाष्य केलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर सतत तणाव असतो. २०१२-१३ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची मालिका खेळली गेली होती. त्या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये २ टी२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. तेव्हापासून दोन्ही संघ फक्त आयसीसी स्पर्धेत आमनेसामने आले आहेत. मात्र, अलीकडेच आशिया कपच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पाकिस्तानला भेट दिली आहे. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका पुन्हा सुरू होणार का? असा प्रश्न पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात विचारला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर खुद्द रॉजर बिन्नीने दिले आहे.

हेही वाचा: IND vs PAK: भारताचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी पाक गोलंदाजांना दिला इशारा; सुपर-४ सामन्याआधी म्हणाले, “आमचे बॅट्समन धावा…”

बीसीसीआय अध्यक्ष-उपाध्यक्षांनी पाकिस्तानला भेट दिली

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पाकिस्तान दौऱ्यावर असताना त्यांचा केलेला पाहुणचाराबाबत म्हणाले की, “खूप छान स्वागत तुम्ही केले मला तुमचा आदर वाटतो.” बोर्डाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना यावेळी सूचक विधान केले. ते म्हणाले की, “क्रिकेटमध्ये दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी मी मध्यस्थीचे काम करण्यास तयार आहे.” पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निमंत्रणावरून बिन्नी आणि शुक्ला आशिया कपचे सामने पाहण्यासाठी तिथे गेले होते. बीसीसीआयचे दोन्ही अधिकारी बुधवारी अटारी वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले. गेल्या १७ वर्षात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती.

उभय संघांमधील क्रिकेट मालिका पुन्हा सुरू होणार का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणावामुळे द्विपक्षीय मालिका होत नाहीत आणि दोन्ही देश फक्त आयसीसी किंवा आशियाई क्रिकेट परिषद स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका सुरू होण्याच्या शक्यतेबद्दल बिन्नी यांना विचारले असता, बिन्नी म्हणाले की, “मी यावर निर्णय घेऊ शकत नाही.” ते पुढे म्हणाले, “बीसीसीआय यावर निर्णय घेऊ शकत नाही. हा विषय सरकारशी निगडीत असून त्यावर त्यांना निर्णय घ्यावा लागेल. आशा आहे की, एक दिवस दोन्ही देशांमध्ये क्रिकेट सामने होतील पण सध्या मी काहीही सांगू शकत नाही. पुढील महिन्यात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे आणि पाकिस्तान संघ भारतात सामने खेळणार आहे.”

हेही वाचा: PAK vs BAN: इमाम-रिझवानची दमदार अर्धशतके! पाकिस्तानसमोर बांगलादेशची सपशेल शरणागती, तब्बल ७ विकेट्सने दणदणीत विजय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचा पाहुणचार पाहून बीसीसीआयचे अधिकारी खुश झाले

मायदेशी परतल्यावर बिन्नी म्हणाले, “आमची पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांसोबत खूप चांगली चर्चा झाली. तिथे आमची चांगलीच काळजी घेतली गेली. त्यांनी आमचा चांगला पाहुणचार केला. क्रिकेट सामना पाहणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे हा आमचा मुख्य अजेंडा होता, एकूणच हा दौरा अप्रतिम होता.” त्याचवेळी राजीव शुक्ला यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आदरातिथ्याचेही कौतुक केले आणि दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यात क्रिकेट महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे सांगितले. ते म्हणाले, “आमची भेट खूप चांगली झाली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आमची व्यवस्था नीट राखली होती. सुरक्षा अतिशय कडेकोट होती.”