भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना आज (२७ जुलै) क्वीन्स पार्क ओव्हल क्रिकेट स्टेडियमवरती सुरू आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवनने अर्धशतकीय खेळी केली. या दरम्याने त्याने एक खास कामगिरी करून माजी कर्णधार विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या शिखर धवनने ७४ चेंडूत ५८ धावा केल्या. त्यामध्ये सात चौकारांचा समावेश आहे. सात चौकार मारल्यानंतर त्याचे एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८०० चौकार पूर्ण झाले. अशी कामगिरी करणारा तो नववा भारतीय ठरला आहे. धवनचे सध्याच्या मालिकेतील हे दुसरे अर्धशतक आहे. पहिल्या सामन्यातही त्याने ९७ धावांची मोठी खेळी केली होती.

८०० चौकारांचा टप्पा पार करून धवनने विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गजांच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला आहे. भारताच्यावतीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सचिन तेंडुलकरने दोन हजार १६ चौकार लगावलेले आहेत. त्यानंतर विराट कोहली (११५९), सौरव गांगुली (११०४) आणि विरेंद्र सेहवाग (१०९२) यांचा क्रमांक लागतो. इतर कोणालाही एक हजार चौकारांचा पल्ला गाठता आलेला नाही. सध्याचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार राहुल द्रविडने ९४३, युवराज सिंगने ८९६, रोहित शर्माने ८५६ आणि एमएस धोनीने ८०९ चौकार लगावलेले आहेत.

हेही वाचा – टी २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघात झाला खास व्यक्तीचा प्रवेश; राहुल द्रविडला होणार मदत

शिखर धवनची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी चांगली आहे. आजचा सामना खेळण्यापूर्वी त्याने १५४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४५च्या सरासरीने सहा हजार ४३५ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १७ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.